August 8, 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक धोरण आखले – प्रा.वनीता पाटील

  • लातूर – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक धोरण आखले होते तसेच त्या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या असे प्रतिपादन प्रा.वनिता पाटील यांनी केले.
    महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभाग आणि महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था,लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय (जयंती उत्सव समिती आणि महिला विकास समिती), लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती प्राचार्य कक्षात उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई होते. तर यावेळी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवप्रसाद डोंगरे, प्रा. किसनाथ कुडके, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, डॉ. अश्विनी रोडे, प्रा. कल्पना गिराम, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    सर्वप्रथम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी सर्वांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून अभिवादन केले.
    पुढे बोलताना प्रा. वनिता पाटील म्हणाल्या की, स्वतःची सर्व कामे स्वतःच अहिल्यादेवी होळकर करायच्या. इंदूरच्या होळकर घराण्याने अहिल्यादेवीना सून म्हणून मागणी केली. पतीचे युद्धात निधन झाल्यानंतर सासरे मल्हारराव होळकर यांच्या छत्राखाली राहून अहिल्यादेवी होळकरांनी सहकार्य केले. मल्हार होळकरांचे निधन झाल्यानंतर राज्याची संपूर्ण जबाबदारी अहिल्यादेवी होळकर यांनी अतिशय व्यवस्थितपणे सांभाळून राज्याचा कारभार सुरक्षित पद्धतीने चालविला म्हणून त्यांना राजमाता म्हणून संबोधिले जाते.
    या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, प्रशासनामध्ये सामाजिक न्यायाची भावना ठेवली पाहिजे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने सोलापूर विद्यापिठाचा नामविस्तार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर असा केला आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी समानतेचे राज्य केले असेही ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विनी रोडे यांनी केले तर आभार प्रा. कल्पना गिराम यांनी मानले.
    या कार्यक्रमाला विनायक लोमटे, रत्नेश्वर स्वामी, पाटील राम, विरसेन उटगे, योगीराज माकने, श्रीशैल्य पाटील, गोपाल तिरमले, महादेव स्वामी, रंगनाथ लांडगे व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!