March 26, 2026

“डॉ.बाबासाहेब आंबेडकर नद्या जोड प्रकल्पाचे जनक” – प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड

  • महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात १३३ दुर्मिळ फोटोंचे भव्य प्रदर्शन उद्घाटन व विशेष व्याख्यान संपन्न
  • लातूर (दिलीप आदमाने ) – भारताचा मूलभूत शाश्वत विकास घडून यावा म्हणून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दामोदर नदी खोरे, सोन नदी खोरे, बहुउद्देशीय विकास प्रकल्प, हीराकुंड धरण, भाक्रा नांगल धरण या सारख्या महाकाय धरणांची निर्मिती करून नद्या जोड प्रकल्पाचा राष्ट्रीय पातळीवरून बृहत आराखडा तयार केला. त्यामुळे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नद्या जोड प्रकल्पाचे जनक ठरतात असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांनी केले.
    श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील ग्रंथालय समिती द्वारा विश्वमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त १३३ दुर्मिळ फोटोंचे भव्य प्रदर्शन उद्घाटन आणि विशेष व्याख्यान कार्यक्रम महाविद्यालयाच्या मुलांच्या अभ्यासिकेमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते उद्घाटक तथा प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई हे होते तर विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, डॉ. आनंद शेवाळे, प्रा.डॉ.कॅप्टन बाळासाहेब गोडबोले आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रदर्शनाची फीत कापून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जगतज्योती महात्मा बसवेश्वर आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
    पुढे बोलताना डॉ.श्रीकांत गायकवाड म्हणाले की,राज्य समाजवाद हे सत्तेचे उद्दिष्ट असून ते साध्य करण्याचे साधन शासन व्यवस्था आहे. प्रत्येक समाजात ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ हे वर्ग असतातच परंतु गरीब माणूस गरीब बनत जाणे आणि श्रीमंत माणूसच श्रीमंतच बनत जाणे ही स्थिती समाजाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून घातक ठरते म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय लोकशाहीचे आर्थिक व सामाजिक लोकशाहीत रूपांतर घडून यावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती असेही ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केला.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश राठोड यांनी केले तर आभार कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले यांनी मानले.
    या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. किसनाथ कुडके, रमेश राठोड, केदार इटगे, गोरख पाखरे, संजय गिरी, मदन कलबोने, शिवशंकर स्वामी, विजयलक्ष्मी शेटे, कीर्ती मिटकरी यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!