June 21, 2025

वेळ अमावस्या साजरी करताना

  • बळीराजाचं पूजन व्हावं.त्याचं आत्मबल वाढावं.सोबत निसर्गातल्या सर्व जिवांना सांभाळण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी यावं.त्याच्या कष्टाचं चिज व्हावं.बळीराजांनं पिकविलेल्या सर्व धान्याला योग्य किंमत मिळावी.त्याच्या श्रमाची,त्याच्या कष्टाची जाणीव सर्व समाजाला व्हावी.म्हणून हा सण मोठ्या उत्साहाने मराठवाड्यात साजरा केला जातो.
    खरं पाहिलं तर या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव हा बळीराजाच्या श्रमावरती जगला जातो.अशा सर्वश्रेष्ठ बळीराजाची कुचंबना हजारो वर्षांपासून होत आलेली आहे.ती कुचंबना धर्मसत्तेकडून झाली,राजसत्ते कडून झाली.न्याय व्यवस्थेकडूनही झालेली दिसते आहे.तरीही बळीराजा कधीच डगमगला नाही,थकला नाही, की कधीच हरला नाही.हरनं हे त्याच्या रक्तात कधीच आलं नाही.
    मोडला कणा जरी
    कधीच हरला नाही
    पोशिंदाच तो जगाचा
    कधीच थकला नाही.
    मित्रांनो काय असते शेती? काय असतो बळीराजा? काय असते घामाच्या थेंबाचे मुल्य,आणि किंमत? हेच तर पाहण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि त्याचं कौतुक करण्यासाठी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
    सर्व शेतकरी बांधव,बंधू भगिनी,लेकरं बाळं आजी-आजोबा सर्व घरातली मंडळी शेतावरती जातात.पाची पांडवांची पूजा केली जाते. पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवून नमस्कार केला जातो.हा नमस्कार खऱ्या अर्थाने बळीराजाला होतो. मायभूमीला होतो.पूर्ण शिवारायांमध्ये हर हर महादेव चा गजर होतो. बळीराजाच्या विजयाचा निनाद ऐकावयास मिळतो.या नमस्कारा नंतर सर्व मंडळी सह भोजनाचा आस्वाद घेतात.माय भूमीला वंदन करत असताना इडा पीडा जाओ बळीच राज्य येऊ अशी निसर्ग देवतेला प्रार्थना करतात.
    जसे लोक पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी वारीमध्ये सद्भावना घेऊन भेटायला जातात.तसेच शेतकरी कुटुंबातील सर्व लोक मायभुला वंदन करण्यासाठी शेतामध्ये जातात.
    मला समजतय तेव्हापासून एकही वर्ष कधीच सुटलं नाही.की मी अशा उत्सवामध्ये सहभागी झालो नाही.शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे शेती हा जगण्याचा मुख्य व्यवसाय आहे.असं समजून.आम्ही सर्वजणच कष्ट करत असतो.
    दरवर्षाला पावसाळा येतो पेरणी होते.चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्याच्या घरामध्ये धन्य धन्य येतं. दुष्काळ पडला तर शेतकरी पोकता कोलमडून जातो. आणि मग हक्काचा विमा मिळवण्यासाठी जीवाचं रान करतो.मग मोर्चा आंदोलने करावी लागतात आत्महत्या करावी लागते. तरीही विमा मिळत नाही. ही केविलवाणी अवस्था बळीराजाची होऊन जाते. असा कणा मोडलेला बळीराजा दरवर्षाला पुन्हा देवाला साकडं घालतो.विनंती करतो.की हे ईश्वरा माझं धन्य धन्य पिकू देत.श्रमलेल्या प्रत्येक थेंबाची किंमत तू कर.परंतु तसं दर वर्षाला होतच असं नाही.ते जे हरलेपण आहे ते बळीराजाच्या आयुष्यातून कायमस्वरूपी जावं.समाधानाचे दिवस यावेत,म्हणून हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
    तरीही मनाला प्रश्न पडतो खरंच दर वर्षी बळीराजा यंदा सारखा आनंदी पाहायला मिळेल काय? त्याच्या शेतीमालाल योग्य भाव मिळेल काय?…
    बळीराजाच्या आयुष्यातला ऊन सावल्यांचा खेळ कधीतरी संपावा.अशीच सद्भावना घेऊन उद्या वेळ आमोस्याचा सण आपण मिळून साजरा करूया.
  • लेखक – भूमिपुत्र वाघ
error: Content is protected !!