August 9, 2025

ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा आणि रमाकांत कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

  • कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – महाराष्ट्र लोकविकास मंचतर्फे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.याच परंपरेत,२०२५ साठीच्या प्रतिष्ठित पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.त्यानुसार दिनांक २३ मार्च रोजी पर्याय सामाजिक संस्था,हसेगाव (के) येथे जेष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा आणि रमाकांत कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    या प्रसंगी व्यासपीठावर पर्याय संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ (अण्णा) तोडकर,एम.एन. कोंढाळकर,भूमिपुत्र वाघ, अनिताताई तोडकर,मनिषा घुले, ओम गिरी, डॉ.व्यंकठ अनिगुंठे, के.व्ही.सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.
    याशिवाय शरद केशवराव झरे, वैदेही सुधीर सावंत,विलासजी गोडगे,शिवराम कांबळे,रणजित बोबडे,बंडू आंबटकर आणि ॲड. राधाकृष्ण बलभीमराव देशमुख या सातही समर्पित सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या २५ ते ३५ वर्षांच्या समाजकार्याच्या योगदानाबद्दल ‘समाजकार्य गौरव पुरस्काराने’ गौरविण्यात आले. या मान्यवरांनी भूकंप,दुष्काळ, कोविड महामारी,पर्यावरण संवर्धन तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे.
    या भव्य पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रभरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र लोकविकास मंच आणि पर्याय सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
    पुरस्कार वितरण सोहळ्यात पन्नालाल सुराणा,रमाकांत कुलकर्णी आणि एम.एन. कोंढाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्याच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात विश्वनाथ (अण्णा) तोडकर म्हणाले – आज दुर्दैवाने,आपण ज्या गोष्टी शरीरासाठी आवश्यक नाहीत त्या मोठ्या प्रतिष्ठेने मॉलमध्ये विकत घेतो,पण आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी मात्र दुर्लक्षित राहतात.शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही, मात्र पॅकिंग केलेल्या क्रीमची पुडी देखील करासहित विकली जाते.हा विचार करण्याचा विषय आहे.”
    या भावनिक आणि प्रेरणादायी सोहळ्याचे सूत्रसंचालन मनिषा घुले यांनी केले,तर आभार प्रदर्शन आश्रुबा गायकवाड यांनी केले.
error: Content is protected !!