March 26, 2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संभाजी विद्यालयात अभिवादन

  • वाशी – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील संभाजी विद्यालयात दिनांक ६ डिसेंबर २o२४ रोजी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याद्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पददलित समाजाचे सर्वश्रेष्ठ नेते होते.अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला व विद्याभ्यासात सतत रममाण होणारा विद्वान,अस्पृश्य समाजाचा स्वाभिमान जागृत करून डॉ.बाबासाहेबआंबेडकर अस्पृश्यांसाठी केलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना अन्यायाचा प्रतिकार करण्यास आणि न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्यास शिकविले.अस्पृश्य हेदेखील याच देशाचे नागरिक आहेत आणि या देशावर इतर कोणाही इतकाच अस्पृश्यांचाही अधिकार आहे,असे त्यांनी ठणकावून सांगितले.
    ३ एप्रिल, १९२७ रोजी त्यांनी ‘बहिष्कृत भारत‘ हे पाक्षिक सुरू केले.अस्पृश्यबांधवांवर शतकानुशतके होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याबरोबरच तथाकथित सवर्ण गणल्या जाणाऱ्या हिंदूंकडून होत असलेल्या विपर्यस्त प्रचारास सडेतोड उत्तर देण्याचे कार्य या पाक्षिकाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेबांनी केले.१५ नोव्हेंबर,१९२९ पर्यंत हे पाक्षिक सुरू होते.
    अस्पृश्यतेतून निर्माण होणारे दुःख व वेदना डॉ. बाबासाहेबांनी प्रत्यक्ष अनुभवल्या होत्या. साहजिकच,अस्पृश्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांचे मन पेटून उठले.त्यातूनच त्यांनी अस्पृश्यांचे हक्क प्रस्थापित करण्याच्या कार्याला सुरुवात केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी भारतातील दलित समाजाच्या उद्धारासाठी जे कार्य केले त्यास इतिहासात तोड नाही. आपल्या अस्पृश्य बांधवांना संघटित करून त्यांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यास व न्याय्य हक्कांसाठी झगडण्यास त्यांनी तयार केले.अशा प्रकारे त्यांनी दलितांमधील अस्मिता जागृत केली.त्याचबरोबर दलितांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून आणि भारताची राज्यघटना तयार करून त्यांनी या देशाचीही फार मोठी सेवा केली.
    डॉ.बाबासाहेबांच्या महान राष्ट्रसेवेप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रारंभाचा योग साधून १४ एप्रिल, १९९० रोजी त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न‘ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्यामुळे या सन्मानाचीही सर्वोच्चता सिद्ध झाली आहे.सन १९५४ ते १९५५ च्या दरम्यान त्यांची प्रकृती खूप खालावली होती.मधुमेह,अंधुक दृष्टी आणि इतर आजारांनी त्यांना ग्रासले होते.६ डिसेंबर १९५६ रोजी मध्यरात्री १२:१५ वाजता त्यांचे महापरिनिर्वाण झाले. यावेळी ते दिल्लीत होते. विशेष विमानाच्या सहाय्याने त्यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईला आणले. त्यांच्यावर बौद्ध धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. असे विचार मुख्याध्यापक युवराज सावंत यांनी केले.
    या प्रसंगी कायक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतीक विभागाचे प्रमुख सुहास जगताप यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्तावीक व समारोप सहशिक्षक संतोष बोडके यांनी केला.
    यावेळी प्रशालेतील सहशिक्षक सुनिल बावकर,संतोष ढोले , शिक्षकेत्तर पत्रकार शिवराम शिंदे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!