सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचा प्रचंड जनआक्रोश मोर्चा
औरंगाबाद – वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२४ ऑक्टोबर २०२५ वार शुक्रवार रोजी आरएसएसच्या कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. “संविधानाचा अपमान चालणार नाही”, “शासन झोपले की जनता रस्त्यावर येते”अशा घोषणा देत वंचित बहुजन आघाडीने शहरात जनतेचा प्रचंड संताप व्यक्त केला.
सुजात आंबेडकर यांनी मोर्चादरम्यान भाषण करताना म्हटले की,“संविधानविरोधी विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या संघटनेला शासनाकडून सुरक्षा पुरवणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे.जनतेचा पैसा जनतेच्या शत्रूंवर खर्च होतोय, हे अस्वीकार्य आहे.” या मोर्चाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीने शासनाला प्रश्न विचारले — “आरएसएसला सरकारी सुरक्षा का?”, “करदात्यांच्या पैशातून संघाला संरक्षण देण्यामागे नेमका हेतू काय?” मोर्चासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मोर्चाचा समारोप संविधान चौकात संविधान वाचन करून करण्यात आला. मोर्चात विविध सामाजिक संघटना, महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्यांनी शहर लाल-निळ्या रंगात न्हाऊन निघाले होते.
RSS च्या कार्यालयात भारताचे संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तीन लोकांचे शिष्टमंडळ गेले मात्र, आरएसएसचे कार्यालय बंद होते.मोर्चा येण्याआधीच आरएसएसचे कार्यालय बंद होते. वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेनंतर आरएसएसने भारतीय संविधान, तिरंगा स्वीकारण्यास नकार देऊन पळ काढला. त्यामुळे, औरंगाबादच्या DCP यांनी हे भारतीय संविधान, तिरंगा ध्वज आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारली. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने दिली भेट ― सुजात आंबेडकर यांनी भारताचा तिरंगा ध्वज दिला,अमित भुईगळ यांनी भारताचे संविधान दिले,शमीभा पाटील यांनी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत दिली.
पोलीस उपायुक्त यांनी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाकडून हे सर्व स्वीकारले. वंचित बहुजन आघाडीचे युवा शहर अध्यक्ष राहुल मकासरे आणि आंबेडकरवादी तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले.काही दिवसांपूर्वी शहरातील एका महाविद्यालयाच्या परिसरात कुठलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे आरएसएसची नोंदणी मोहीम सुरू होती.त्या मोहिमेला वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर अध्यक्ष राहुल मकासरे यांनी विरोध दर्शीवला व तो अनधिकृत स्टॉल हटवला.या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून राहुल मकासरे,विजय वाहुळ आणि इतर लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. याविषयी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत पोलिसांना नोंदणी नसलेल्या आरएसएस संघटनेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र,पोलिसांनी ती फेटाळून लावली.त्याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस फौजफाटा – सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथून या ‘जन आक्रोश मोर्चा’ला सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत होते. मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना शपथ – मोर्चादरम्यान,युवा जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी उपस्थितांना शपथ दिली. यावेळी सुजात आंबेडकर,राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे,अरुंधतीताई शिरसाट,राज्य कमिटी सदस्य अमित भुईगळ,डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे,फारुख अहमद, नागोराव पांचाळ,शमीभा पाटील, सविताताई मुंडे, प्रवक्ते तय्यब जफर, जितरत्न पटाईत,सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, युवा आघाडीचे अमोल लांडगे, डॉ.अरुण जाधव, औरंगाबाद युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर,पंकज बनसोडे, संदीप जाधव यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी ‘भारतीय संविधान जिंदाबाद’, ‘RSS मुर्दाबाद’ अशा जोरदार घोषणा दिल्या.
More Stories
बाबांच्या जाण्याने देशातील वंचित–कष्टकरी पोरके झाले : मान्यवरांची भावना
महाराष्ट्राची “संपदा” हरवली
पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी विभागीय आयुक्त पापळकर यांचे आवाहन