(२२ सप्टेंबर २०२४) गोरगरीबांची लेकरं शिकली पाहिजे.मोठी झाली पाहिजे त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे म्हणून ०४ ऑक्टोबर १९१९ ला विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर रयत शिक्षण संस्था उभी केली.”पद्मविभूषण कर्मवीर भाऊराव पाटील ” तथा “अण्णा” त्रीवार सलाम.! मानवमुक्तीचे प्रणेते संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या हातात हात घालून झोकून दिले स्वतःला.! “अण्णा”, थकलेल्या पंखांना बळ अन् भूकेलेल्यांच्या चोचीत घास घातलात.”कमवा आणि शिका”,उजेडाचे दान वाड्या वस्त्यात, झोपडीत नेहलात.! “अण्णा ” अन्याय अत्याचारानं बळी पडलेल्या, खचलेल्या , गावकुसाबाहेर वाळीत टाकलेल्या वंचित, बहूजनांच्या लेकरांना शिक्षणाची कवाडे उघडली. माझ्या दाढीला जेवढं केस आहेत तेवढी तरी गरीबांची लेकरं शिकवीन.! उभं आयुष्य “अण्णा” आपण वेचले.प्रज्ञासूर्यानीही शिक्षणाला वाघीणीचे दूध म्हटले आहे.वाघासारखं गुरगुरणं हे जनतेच्या कल्याणासाठी असावं.आज शिक्षणाचा बाजार मांडलाय . आयटीआय,डी.एड.बी.एड् अध्यापक महाविद्यालयाची जागा अभियांत्रिकी महाविद्यालय,आयआयटी, वैद्यकीय महाविद्यालयानं घेतलीय,इंग्रजी माध्यमाच्या बागुलबुवा दाखवून काळाची गरज म्हणून मराठी शाळा पटसंख्येच्या नावाखाली बंद पाडल्या जात आहेत.गावोगागावी इंग्रजी माध्यमाच्या शाळा खाजगी,विनाअनुदानीत का असेना,उभ्या केल्या जात आहेत. स्वत:ला शिक्षणमहर्षी म्हणून घेणारे आज गब्बर झाले.भरमसाठ वाढवलेली फी, उच्च शिक्षणाच्या नावाखाली खाजगी शिकवण्याचे पेव फुटले आहेत.आजचा विद्यार्थ्यांचं खेळायचे बागडायचं वय पण त्यांच्या डोक्यात फक्त परदेशी हावर्ड,ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, लंडन,अमेरिका टाकले जात आहे.जे लक्ष्मीकांत, लक्ष्मीपुत्र, आहेत त्यांनी मी, माझं,घर,माझी मुलं, फार, फार तर सासुरवाडीकडील नातेवाईक यांच्यासाठीच विकास योजना राबवू नये.फक्त इन्फ्रास्ट्रकचर, गटार, नाल्या बांधल्या म्हणजे विकास नव्हे. माझं गावं,माझं, शहर, राज्य, राष्ट्र डोळ्यासमोर ठेवले तर बेरोजगारांचे तांडे, शेतकरी शेतमजूराचें लोंढे मुंबई, पुण्यावर आदळणार नाहीत. विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, यांच्या योजना शेवटच्या माणसांसाठी अर्थात लाभार्थ्यांपर्यंत पोचला की नाही ?हेही शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अवलोकन करणे आम्हाला गरजेचे वाटते.फक्त ॲण्टीचेंबर मध्ये बसून चहा कॉफी व बिस्किट खात अवलोकन करून त्या क्षेत्राचा विकास आराखडा बनवणे योग्य आहे का? आज आदर्शांचे पुतळे उभे करण्यापेक्षा त्यांच्या नावाने आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्या आदर्शांच्या नावाने नालंदा विश्वविद्यालय , वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाविद्यालय उभं करणं काळजी गरज आहे.कारण केंद्र असो की, राज्य सरकारचा पैसा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी खर्च होत आहे.तरीही शासकीय, ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी तग धरीत नाहीत.शिकले.प्रॅक्टीस केली की पळाले मोक्याच्या ठिकाणी यावरही मंथन व्हायला हवे.फक्त वातानुकूलित ऑफीसमध्ये चार चौघं बसून व्हीडीओ काॅन्फरन्स घेऊन टाटा, बाय,हसत रहात कागदावर उतरवत निर्देश देणें म्हणजे रस्त्यावरची , हातावरच्या नाडी तपासली म्हणणे बरोबर आहे? हेही ज्ञात असावे नव्हे गांभीर्याने घ्यावे.शैक्षणीक बुद्ध्यांक अशाने वाढेल? विकास योजना ख-या लाभार्थ्यां राबविण्यात याव्यात.समाजमनाचा कानोसा घेतला असता जनभावनेचा आदर व्हायला हवा असे आमचे वैयक्तिक मत आहे.सामाजिक स्वातंत्र्य,न्याय ,बंधुता अर्थात “शिक्षण”, हे माणसाच्या विकासाची गंगाच नाही का? “शिक्षण”,हे फक्त साध्य नसून साधनही आहे.शिक्षणाने,नवसंस्कृती नवसमाज घडत असतो.”अण्णा” फक्त तुम्ही शाळाच उभ्या केल्या नाहीत तर हाडामासाची माणसंही उभी केलीत.”अण्णा” आज १३७ व्या जयंतीनिमीत्तानं आपल्या पूजनीय व्यक्तीमत्वाला कफल्लक फकिर शब्दांत व्यक्त होतो आहे. आमच्यासारख्यां अनेक संवेदनशील महाराष्ट्र नवनिर्माणाची आस असलेल्या अर्थात आज मितीला वास्तव सत्याला जीव लावणा-या लाखो सर्जनांना कृतज्ञता म्हणून आपल्या वैचारिक प्रेरक शक्तीचा जागर करताना शत् शत् नमन करावेसे वाटते.आज संस्थापक रयत शिक्षण संस्था सातारा जिल्ह्यात माळरानावर आपण उभ्या केलेल्या “पवित्र मंदीराचा” “वटवृक्ष”, झालाय.आज या शिक्षण संस्थेच्या अनेक ज्ञानमंदीरातून हजारो विद्यार्थी, सैनिक,पीएचडी,एम.डी.अभियंता, न्यायदाते, वकील , लोकप्रतिनिधी, झाले आहेत.”अण्णा”,आज समर्पित भावनेने आपण केलेलं दान बघायला आज आपल्यातला “सत्यशोधकी”, हयात नाही.! “अण्णा” “आपल्या ज्ञानगंगेला शत् शत् नमन.!
More Stories
उल्हास नदी बचाव समितीच्या आंदोलनाला यश;अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटीचा दंड
प्रेरणा फाउंडेशनचा मोफत आरोग्य शिबीर व सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा धुमधडाक्यात साजरा
जिंदादिली का दुसरा नाम, जालिंदर सावंत साहेब!