August 9, 2025

टीडीआर घोटाळा: संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनास दोन महिने पूर्ण; अद्याप कारवाई नाही

  • पुणे (अशोक आदमाने)- वाकड टीडीआर घोटाळ्या प्रकरणी कारवाई व्हावी यासाठी पिंपरी महापालिकेसमोर उपोषणास बसलेल्या संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनास तब्बल दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.परंतू मनपा आयुक्तांनी टीडीआर घोटाळ्या प्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही.यातून आयुक्त गांधारीची भूमिका पार पाडत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. तर दोषींना आयुक्त पाठीशी घालत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी केला आहे.
    दरम्यान वाकडमधील टीडीआर घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड व शहर अभियंता मकरंद निकम तसेच इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी,यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतू मनपा प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दोषींना वाचविले जात आहे.वाकड टीडीआर घोटाळ्या प्रकरणी संभाजी ब्रिगेडने पुकारलेले आंदोलन हे महापालिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त दिवस करण्यात आलेले आंदोलन आहे.महापालिकेच्या तिजोरीवर तसेच करदात्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना मनपा प्रशासन वाचवित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.संपुर्ण महाराष्ट्रभर चर्चिल्या गेलेल्या टीडीआर घोटाळ्या प्रकरणी आयुक्तांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे,पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते,कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण,उपाध्यक्ष वैभव जाधव, सचिव रावसाहेब गंगाधरे,संघटक वसंत पाटील, शहर कार्याध्यक्ष संतोष शिंदे,उपाध्यक्ष अभिषेक गायकवाड,योगेश पाटील, कल्पनाताई गिड्डे,मोनल शिंत्रे हे पदाधिकारी साखळी उपोषण करत आहेत.
error: Content is protected !!