April 2, 2026

“महिलांच्या नेतृत्वात साजरी होणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती”;कळंब आगारात जयंती समितीची घोषणा

  • कळंब – कळंब येथील दत्त मंदिर,रा.प.कळंब आगार येथे विश्वरत्न बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत आगारातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,विशेषतः महिला कर्मचाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती हे या बैठकीचे वैशिष्ट्य ठरले.
    कार्यक्रमाची प्रस्तावना रविकांत शिंदे यांनी मांडली.यावेळी जयंती उत्सव समितीची निवड सर्वानुमते करण्यात आली.समितीच्या अध्यक्षपदी सौ.राजकन्या गवळी (निंबाळकर) यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष म्हणून वंदना पालके,सचिवपदी सौ. संध्या सोनटक्के,कोषाध्यक्षपदी सौ.सरोजा औसेकर व सौ. निवेदिता रणदिवे,तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून सौ.प्रियंका शिंदे व सौ.अनुराधा भोसले यांची निवड करण्यात आली.
    बैठकीस प्रकाश पटेकर,रविकांत शिंदे,नितीन गायकवाड,प्रशांत गायकवाड,अंकुश गायकवाड, संघरक्षित गायकवाड,बिभीषण क्षीरसागर,विलास थोरात, अशोक रणदिवे,विश्वनाथ गव्हाळे,आर. वाय. नकाते,एस.एस.कानडे, एस.आर.जाधव,सुनील जगताप, सुबोध रणदिवे,श्याम बनसोडे, एस.बी.पठाण,डी.सी.सरवदे आदी उपस्थित होते.
    विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रियांसंबंधी विचार अत्यंत पुरोगामी आणि स्त्री-पुरुष समानतेवर आधारित होते. स्त्रीला शिक्षणाचा अधिकार, संपत्तीत समान वाटा आणि सामाजिक सन्मान मिळावा यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.“एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली पाहिजे,” हे त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरत आहेत.
    याच विचारांचा आदर्श ठेवत, कळंब आगारात यंदाच्या जयंती उत्सव समितीचे नेतृत्व महिलांकडे सोपवण्यात आले आहे. “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो,परंतु स्वतंत्र भारतातील स्त्रियांच्या प्रगतीमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच योगदान सर्वात मोठे आहे,” या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
    एकूणच,महिलांच्या नेतृत्वाखाली साजरी होणारी ही आंबेडकर जयंती समता, सशक्तीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण करणार आहे.
error: Content is protected !!