February 24, 2026

७० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ विशेष मोहीम

  • धाराशिव (जिमाका)– एकत्रित Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana अंतर्गत ७० वर्षे व त्यावरील नागरिकांचे “आयुष्मान वय वंदना कार्ड” निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागात गावनिहाय व शहरी भागात वॉर्डनिहाय विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीचा सर्वंकष आढावा घेण्यात आला.
    सध्या जिल्ह्यात ७० वर्षे व त्यावरील ९७ हजार ७४१ लाभार्थी पात्र असून त्यापैकी १४,८३८ (१५ टक्के) लाभार्थ्यांचे आयुष्मान वय वंदना कार्ड ई-केवायसी पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
    लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी आशा कर्मचारी,स्वस्त धान्य दुकान चालक तसेच आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रती यशस्वी ई-केवायसीसाठी २० रुपये व आयुष्मान कार्ड वितरणासाठी १० रुपये असे एकूण ३० रुपये मानधन देण्याबाबत शासन निर्णय पारित करण्यात आला आहे.
    या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत उपचाराचा लाभ मिळतो. तसेच ७० वर्षे व त्यावरील “आयुष्मान वय वंदना कार्ड” धारकांना प्रति लाभार्थी प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत २३९९ आजारांवरील मोफत शस्त्रक्रिया व उपचार सुविधा उपलब्ध आहे.
    ही सुविधा जिल्ह्यातील २७ खाजगी व १३ शासकीय अशा एकूण ४० रुग्णालयांमध्ये तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध आहे.
    जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ग्रामपंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र,CSC केंद्र,रेशन दुकानदार, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून आयुष्मान कार्ड मोफत काढून देण्यात येणार आहे.७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी “आयुष्मान वय वंदना कार्ड” काढून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे.
    सदर विशेष मोहीम २० फेब्रुवारी ते १३ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.संबंधित कर्मचारी गाव,वॉर्ड,वाडी,वस्ती, शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन आयुष्मान कार्डचे ई-केवायसी करणार आहेत.
    लाभार्थ्यांना स्वतःही ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अँड्रॉईड मोबाईलमध्ये आयुष्मान अॅप डाउनलोड करून ‘Beneficiary’ बटनवर क्लिक करून लाभार्थी स्वतःचे ई-केवायसी करू शकतात. तसेच ‘Operator Login’ मधून “For Senior Citizens of the age of Seventy years & Above – CLICK HERE TO ENROLL” या पर्यायाद्वारे “आयुष्मान वय वंदना कार्ड” काढता येणार आहे.अन्यथा ग्रामपंचायत, CSC केंद्र,आशा स्वयंसेविका, रेशन दुकानदार किंवा आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधूनही ई-केवायसी करून घेता येईल.
    जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली गावनिहाय नियोजन करण्यात आले असून सर्व विभागांच्या समन्वयातून मार्च २०२६ अखेरपर्यंत जिल्ह्यातील ७० वर्षे व त्यावरील सर्व लाभार्थ्यांचे १०० टक्के ई-केवायसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांनी दिली.
error: Content is protected !!