February 8, 2026

संविधाननिष्ठ नेतृत्वाचा सन्मान: बाबासाहेब कांबळे यांची वंचित बहुजन आघाडीच्या उपजिल्हाध्यक्षपदी निवड

  • धाराशिव – वंचित,शोषित व बहुजन समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे,खंबीर व निर्भीड नेतृत्व म्हणून ओळख असलेले आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कांबळे यांची वंचित बहुजन आघाडीच्या उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले बाबासाहेब कांबळे सर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे निष्ठावंत अनुयायी आहेत. संविधानिक मूल्यांनुसार कार्य करत,अन्याय,शोषण व भेदभावाविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.वंचित, दलित,आदिवासी,अल्पसंख्याक तसेच कष्टकरी समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी राबवलेली आंदोलने व सामाजिक उपक्रम समाजात प्रभावी ठरले आहेत.
    तळागाळातील घटकांना न्याय, हक्क व सन्मान मिळवून देण्यासाठी कोणत्याही दबावाला न झुकता सत्य व न्यायाच्या बाजूने उभे राहणे हीच बाबासाहेब कांबळे सर यांची ओळख आहे.त्यांच्या निर्भीड व स्पष्ट भूमिकेमुळे त्यांची एक सशक्त नेतृत्व म्हणून समाजात वेगळी छाप निर्माण झाली आहे.
    वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर उपजिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून संघटनेत नवचैतन्य निर्माण केले असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या निवडीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल,तसेच बहुजन समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    बाबासाहेब कांबळे यांच्या निवडीचे स्वागत करत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,विविध सामाजिक संघटना तसेच आंबेडकरवादी विचारवंतांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही निवड म्हणजे केवळ एका पदाची नियुक्ती नसून, संविधान,समता व सामाजिक न्यायाच्या लढ्याला मिळालेली नवी ऊर्जा असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
error: Content is protected !!