February 8, 2026

धम्म शिबीर माणसाचे आयुष्य बदलून टाकते ही जादू नसून वास्तव आहे – धम्मचारी अनोमकीर्ती

  • उमरगा – धम्म शिबीर माणसाचे आयुष्य बदलून टाकते ही जादू नसून वास्तव आहे.त्रिरत्न बौद्ध महासंघाचे निवासी धम्म प्रशिक्षण शिबीर शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात नुकतेच घेण्यात आले.भन्ते उर्गेन संघरक्षित यांनी लिहिलेल्या पारमार्थिक काव्यावर घेण्यात आलेल्या शिबिराचें नेतृत्व पुणे येथील धम्मचारी अनोमकीर्ती यांनी केले. शिबिरात नियमित अनापान सती, मैत्री विकास या ध्यान साधनेचा प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला.व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य, मुक्ताविष्कारावर भर देण्यात आला.शिबिरार्थीच्या पाल्यास चित्रकला,गायन,खेळ,नकला अभिनय आदी उपक्रम राबवून बालकांना आणि त्यांच्या पालकांना संस्काराचे धडे देण्यात आले.समर्पित धम्म जीवन हा विषय समजावून सांगताना अनोमकीर्ती यांनी माणसाने सर्वाप्रति कसे कृतज्ञ राहिले पाहिजे यांचे दाखले दिले.संत तुकाराम महाराज,एकनाथ महाराज,ज्ञानेश्वर महाराज,गाडगे महाराज यांची समतेची शिकवण आणि वारकरी संप्रदायाचे शील पालनाचे वृत्त यांचे मुक्त विवेचन केले.प्रत्येक वर्षी दिवाळी,उन्हाळी सुट्टीत महासंघाच्या जेष्ठ धम्मचायांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात येते.
    #आनापानसत्ति ध्यानाचे फायदे –
    श्वसन प्रणाली शुध्द होते, रक्ताभिसरण सुधारते,रोगप्रतिकार शक्ती वाढते,ताण तणाव,थकवा कमी होतो,अनिद्रा,डोकेदुखी, रक्तदाब नियंत्रित होतो,मन स्थीर रहाते,विचाराचा वेग कमी होतो, एकाग्रता वाढते,विचारांचे मनोनिरीक्षण करता येते.राग,द्वेष, भीती यावर नियंत्रण करता येतो. स्मरण शक्तीत वाढ होते. निर्णयक्षमता वाढते.आदी फायदे सांगण्यात आले.
    तथागत गौतम बुद्धाची शिकवण मानवाच्या कल्याणासाठी आहे. दारू पिऊ नये,चोरी करू नये, व्यभिचार करू नये,खोटे बोलू नये आणि प्राणी हत्या करू नये ही सामान्य माणसाला दिलेली बुद्धाची शिकवण आहे.तिलाच पंचशील म्हणतात.या पंचशीलाच्या परिपालनासाठी कटिबद्ध राहिल्यास माणसाची प्रगतीच होणार आहे.या शिकवणीवर भर देत माणसाला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी हे शिबीर फलदायी ठरले.
    पाच दिवसांच्या कालावधीत धम्मचारी रत्नपालित यांनी पंचशील या विषयावर भाष्य केले. धम्मचारी धम्मभूषण यांनी सबोधी प्राप्ती या विषयावर विवेचन केले तर धम्मचारी जिनघोष यांनी बहुजन हिताय या विषयाची मांडणी करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
    शिबिरात दाखल होणाऱ्या प्रत्येक महिला पुरुषांना प्रारंभी थोडे कठीण वाटले पण जसजश्या शिबिरात गुपचर्चा रंगू लागल्या त्यात प्रत्येकांनी आपले अनुभव कथन केले.शिबीर संपताना प्रत्येक व्यक्ती संकल्प पूर्वक ही शिदोरी घेऊन त्या प्रमाणे जीवन जगण्याचा आटोकाट प्रयत्न करन्याचा संकल्प केला.या शिबिरात केंद्राचे चेअरमन धम्मचारी रत्नपालित,धम्मचारी ज्ञानपालित,धम्मचारी प्रज्ञाजित, धम्मचारी समंतबंधू,धम्मचारी असंघवज्र,धम्मचारी जिनोदय, धम्मचारी धम्मभूषण,धम्मचारी विबोध यांनी सहभाग घेऊन गुपचर्चेचे नेतृत्व केले.समारोपीय प्रवचनात अनोमकीर्ती यांनी बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या वेळी सांगितलेल्या मुख्य संदेश म्हणजे सुखाचा संसार करायचा असेल तर धर्मांतर करा.सुखाचा संसार करायचा म्हणजेच धम्माचे आचरण करून सुखी जीवन जगावे हा संदेश सांगितला. समर्पित जीवन म्हणजे काया, वाणी,मनाची विधायक कृती होय.
    मनो पुबगम्मा धम्मा मनोशेटा मनोमया या धम्म पदातील गाथे नुसार सर्व धर्माचे उगमस्थान मन आहे.त्यामुळे मनातून विधायक भाव निर्माण करून समर्पित धम्म जीवन जगणे म्हणजे समर्पित धम्म जीवन होय,दररोज आमची मने प्रबुद्ध बनोत,आमचे विचार धम्म बनोत आणि आमचे परस्परांतील संबंध संघ बनोत ही शिकवण दिली.पाच दिवस चाललेल्या शिबिरात स्वयं शिस्त लागावी म्हणून प्रत्येकाना सफाई,आवार सफाई,पूजस्थान सजावट,वाढपी, आदी विभागात काम करतांना शिबिरार्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.या शिबिरात अनेकांनी दान देऊन हे शिबिर यशस्वी करण्यास मदत केली.शिबिराचे संयोजक म्हणून उत्तम गायकवाड,वगरसेन कांबळे, अजय गायकवाड,प्रियदर्शी कांबळे,संघप्रिया कांबळे,राजेंद्र भालेराव,पंकज गवळी,राजेंद्र सुरवसे,जी.एल.कांबळे,तेजस्विनी गायकवाड,मंदाताई टिळे,सुनील भालेराव,मारुती कांबळे,राजेंद्र माटे,राजेंद्र सुरवसे शाक्यदीप कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!