February 8, 2026

लसाकम शाखा तर्फे भव्य गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व प्रेरणादायी व्याख्यानमाला कार्यक्रम

  • धाराशिव – साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त रविवार दि.३१ ऑगस्ट २०२५ रोजी क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (लसाकम) शाखा धाराशिवतर्फे स्काऊट गाईड कार्यालय, धाराशिव येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व प्रेरणादायी व्याख्यानमाला कार्यक्रम भव्यदिव्य वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.
    कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली.प्रथम खंदारे सिस्टर यांनी कविता सादर केली तर एम.पी.कसबे सर यांनी प्रस्ताविकातून कार्यक्रमाला दिशा दिली.
    या प्रेरणादायी सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते सतीश कसबे, जोशीलाताई लोमटे,महादेव पेठे, बिभीषण लोमटे,संतोष मोरे, उर्मिलाताई झोंबाडे,बापूराव भंडारे, प्रकाश कांबळे,दिलीप पाटोळे, दत्ता गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    प्रमुख पाहुणे प्रभाकर लोंढे (न्यू भारतीय टायगर सेना व खडतर प्रवास),लसाकम तालुका अध्यक्ष दिलीप मोरे यांनी आपल्या भाषणातून आण्णाभाऊंच्या साहित्याचे वास्तवदर्शी प्रतिबिंब समाजात कसे उतरते यावर प्रकाश टाकला.
    बार्टी आणि आरटी संस्थेच्या प्रकल्प अधिकारी सौ. सायली लोमटे यांनी शिष्यवृत्तीच्या विविध योजना,आवश्यक कागदपत्रे व परदेशी शिक्षणाच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जनसंपर्क अधिकारी स्वप्निल भालेराव यांनी स्पर्धा परीक्षा व मोफत व्यावसायिक प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.
    प्रमुख व्याख्याते दशरथ उकिरडे सर यांनी “भारतीय संविधान आणि मूलभूत अधिकारांची जनजागृती ही काळाची गरज” असल्याचे प्रतिपादन केले.
    अध्यक्षीय भाषणात लसाकम जिल्हाध्यक्ष अभिमान पेठे सर यांनी “सेवानिवृत्तीनंतरही समाजकार्याची ऊर्जा सामाजिक व्यथा व अडचणींमधूनच मिळते” असे सांगत परिवर्तनवादी विचार स्वीकारण्याचे आवाहन केले.
    गुणगौरव सोहळ्यात जवळपास ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहावी, बारावी, पदवी व अभियंता शिक्षणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, आण्णाभाऊंचे साहित्य (फकीरा, वारणेचा वाघ आदी कादंबऱ्या) तसेच भारतीय संविधान भेट म्हणून देण्यात आले.
    या प्रसंगी साक्षी कसबे हिने “मागे नाही आम्ही, आता पुढे जाणार आहोत – ही आण्णाभाऊंच्या लेखणीची ललकार आहे” असे प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग घोडके यांनी केले,तर आभारप्रदर्शन दगडू क्षीरसागर यांनी केले.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश खंदारे बाप्पा,राघू कसबे, शंकर घोडके,सचिव बालाजी गोट मुकले,श्रावण सुरवसे आदींनी मोलाचे परिश्रम घेतले.
error: Content is protected !!