धाराशिव – जिल्हा परिषद शाळांमध्ये विषय शिक्षकांची नियुक्ती करावी तसेच विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आढळलेल्या त्रुटींवर कठोर कारवाई करावी, अशा ठाम मागण्या आमदार कैलास पाटील यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे सभागृहात मांडल्या. या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्री भुसे यांनी आवश्यकतेनुसार व पटसंख्येच्या आधारे जिल्हा परिषद शाळांमध्ये लवकरच विषय शिक्षक नियुक्त करण्यात येतील,असे सांगितले. तसेच पोषण आहारात आढळलेल्या आळ्यांच्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून, यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार पाटील यांनी ग्रामीण शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची गरज,शौचालयांची व्यवस्था आणि शाळांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.त्यांनी शासकीय यंत्रणेतील दोहरी भूमिका अधोरेखित करताना सांगितले की, आमदार निवासातील कॅन्टीनमधील निकृष्ट जेवणावर तात्काळ कारवाई होते,तर विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आळ्या आढळूनही संबंधित गुत्तेदारावर अजूनही कारवाई झाली नाही,हा दुजाभाव आहे. शिक्षण मंत्री भुसे यांनी स्पष्ट आश्वासन दिले की,जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांचा विकास करण्यात येईल आणि एक वर्षाच्या कालावधीनंतर शाळांचे चित्र निश्चितपणे बदललेले दिसेल.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य