धाराशिव (जिमाका)- प्रवासी जनता व विविध प्रसार माध्यमांनी धाराशिव व तुळजापूर येथील एसटीच्या बस स्थानकाच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी नोंदवलेल्या आहेत.या तक्रारीची गंभीर दाखल घेऊन या दोन्ही बसस्थानकाच्या बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.अशाप्रकारे सर्वसामान्य नागरिकांचा पैसा वाया घालवणाऱ्या प्रवृत्तीला कठोर शिक्षा केली जाईल,असे नि:संधिग्द आश्वासन परिवहन मंत्री,एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.ते धाराशिव येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. पालकमंत्री सरनाईक म्हणाले,मी १ मे रोजी धाराशिव व तुळजापूर येथील बसस्थानकांचे उद्घाटन केले.परंतु नंतर चौकशी केली असता मला असे समजले की,त्या बसस्थानकाचे काम अद्यापि पूर्ण झाले नव्हते.अशाप्रकारे घाईघाईत उद्घाटन करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी केली जाईल आणि चौकशीअंती ते दोषी ठरले असतील तर यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. शासनकडून सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून त्यांच्या सोयीसाठी बसस्थानके बांधली जातात.अशा पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने व्हावा ही नागरिकांची किमान अपेक्षा असते.परंतु केवळ महिन्याभरातच बसस्थानकाच्या बांधकामाबाबत तक्रारी येत असतील तर ते योग्य नाही.अशा निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या प्रवृत्तींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.असे प्रतिपादन पालकमंत्री सरनाईक यांनी केले.
More Stories
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत;शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी
जनगणना २०२७ ची तयारी ३७३१ कर्मचारी सज्ज
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल