खरंतर निजाम काळ पाहिलेली व अनुभवलेली जुनी जाणती माणसं आता फार कमी राहिलेली आहेत. एक एक पिकलं पान गळून पडत चाललं आहे. येणाऱ्या नव्या पिढीला जुना इतिहास अशाच जुन्या मंडळीकडून ज्ञात होत असतो आणि माझं भाग्य असं की अशा अनेक मंडळींशी माझा स्नेह होता व आहे देखील. इतिहासाची आवड असेल म्हणून म्हणा अथवा जुन्या जाणत्या वृद्ध लोकांशी गप्पाटप्पा मारण्याची आवड म्हणून म्हणा अशा अनेक वयोवृद्धांच्या सहवासात राहून त्यांच्याशी गप्पाटप्पा मारून माझं स्वतःचं आयुष्य अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांनी समृद्ध बनलं आहे याचा मला स्वतःला खूप अभिमान वाटतो. असंच एक, ज्यांच्यासोबत अनेकदा तासंतास विविध विषयावर चर्चा व्हायच्या ते कै. शिवाजी बाबुराव शेळके (नाईकवाडी) या नावाचा पिकलं पान नुकतेच गळून पडलं. याच महिन्यात वयाची ८८ वर्षे संपवून ८९ व्या वर्षात पदार्पण करणार होते, इतकेच काय शंभरी ही त्यांनी अगदी सहज हसत खेळत पार केली असती. परंतु विधीलिखित कोणाला कधी कळले का ? ज्या दिवशी जग आर्थिक वर्ष पूर्ण करत असतं त्याच ३१ मार्च २०२५ रोजी शिवाजी बाबुराव शेळके यांनी आपल्या आयुष्याची गोळा बेरीज पूर्ण करून जगाचा निरोप घेतला. येणाऱ्या प्रत्येकाला जावेच लागणार आहे हा प्रकृतीचा नियम आहे. खरं तर ते माझ्या मित्रांचे वडील असल्यामुळे मी त्यांना काका म्हणूनच संबोधित असे. माझे मित्र सुरेश व रमेश ही त्यांची दोन्ही मुले आणि सुरेखा ही मुलगी अशी तीन मुले व पुढे तिघांचाही मुलाबाळांचा परिवार असा मोठा विस्तार आहे शेळके काकांचा. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी २७ एप्रिल १९३७ सालचा त्यांचा जन्म. एकूण पाच भाऊ व तीन बहिणी असा मोठा परिवार आहे त्यांचा. ज्या समता कॉलनी मध्ये माझ्या सामाजिक साहित्यिक व राजकीय जीवनाची सुरुवात झाली ती समता कॉलनी शेळके यांच्याच मालकीच्या असलेल्या जमिनीवर निर्माण झाली आहे हे विशेष. शेळके आणि नाईकवाडी हे दोन दोन आडनाव कसे काय हा माझ्यासाठी देखील कुतुहलाचा मुद्दा होता, मात्र त्यांच्याकडूनच माहिती मिळाली होती की नाईकवाडी हे एक पूर्वीच्या काळी पाटील, देशमुख सारखे पद होते जे त्यांच्या पूर्वजांना मिळालेले होते, परंतु त्यांचे मूळ आडनाव हे शेळके होते. अशा सुखवस्तू सधन जमीनदार कुटुंबातून असूनही ते त्या काळातील दहावी पास होऊन स्टेट सीआयडी मध्ये नोकरीस लागले होते आणि पुढे चालून सेंट्रल सीआयडी खात्यात सेवा देऊन ३३ वर्षांपूर्वी ए एस आय म्हणून सेवानिवृत्त झाले होते. पोलिसी खात्याची करडी नजर व शेवटपर्यंत असणारी आवाजातील जरब हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. सुरुवातीला मलाही त्यांच्याशी बोलताना जरा वेगळं वाटायचं. त्यांच्याबद्दल एक दरारा वाटायचा, भीतीही वाटायची. मात्र दोन-तीन भेटीनंतर त्यांच्याशी माझी चांगलीच गट्टी जमली होती. त्यांना मी कविता लेखक कथा कादंबरी असे साहित्य लिहितो याचे खूप कौतुक वाटायचे. लातूरचे आमचे कवी मित्र योगीराज माने हे देखील सुरेश शेळके यांचे बालपणापासूनचे मित्र होते, त्यामुळे आम्ही सर्व मिळून काका सोबत बसून तासंतास गप्पा मारत असू. त्यावेळी त्यांच्यातील साहित्य विषयी असलेले प्रेम दिसून यायचे. उत्तम रचनांना आवर्जून दिलखुलास दाद द्यायचे शेळके काका. त्यांना स्वतःला या ही वयात काही कविता मुखोद्गत होत्या त्या ते म्हणून दाखवत असत. ते जसे उत्तम रसिक होते त्याचबरोबर अभ्यासू देखील होते. वेगवेगळ्या विषयावर त्यांचे चिंतन असे व चर्चेदरम्यान ते प्रकर्षाने जाणवत असे. भारताला स्वातंत्र्य मिळूनही हैदराबाद संस्थानात असलेला मराठवाडा निजामाच्या पारतंत्र्यात होता, आणि ती राजवटही त्यांनी स्वतः अनुभवली होती. असेच एकदा सुरेश शेळके यांचा फोन आला व म्हणाले की काका बोलवत आहेत येऊन जा. मी घरी गेलो शेळके काकांची स्वतंत्र बैठक व्यवस्था होती तिथेच ते बसलेले होते. मी जाताच, ‘ये युवराज, इथं बस..’ असं म्हणत मला पुस्तक दाखवलं, ते माझंच होतं ‘मराठवाडा नव्हे ,भारत मुक्ती संग्राम’. ते म्हणाले, “मी खूप वाचन केलं आहे आयुष्यात, पण हे पुस्तक मी वाचायला हातात घेतलं आणि शब्द न शब्द वाचतच राहिलो वाचतच राहिलो. रात्रभरही वाचन केलं आणि वाचन पूर्ण झाल्यावरच पुस्तक हातातून खाली ठेवलं. मला तो काळ जसाचे तसा डोळ्यासमोर दिसत होता. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. काय लिहिलंस रे युवराज..!” असं म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. या पुस्तकाला दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि आता एक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे, मात्र काकांचे ते भावनिक व्यक्त होणं माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे असं मला वाटलं. आजच्या जगात टीव्ही मोबाईलसह इतर अनेक मनोरंजनाची साधने अस्तित्वात असतानाही शेवटपर्यंत काकांनी रेडिओ ऐकण्याचा छंद सोडला नाही. घरासमोर खुर्ची टाकून हातात रेडिओ घेऊन बसलेले शेळके काका माझ्यासह अनेकांच्या कुतूहालाचाच विषय होते. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होतं. सीआयडी मध्ये लागल्यानंतर त्यांना ड्रिंक्स ची सवय लागली, आणि विशेष म्हणजे स्वतःच्या ड्रिंक्सचा दरवर्षी न चुकता वाढदिवस ते साजरा करायचे. ड्रिंक्स चा वाढदिवस साजरा करण्याची त्यांची पद्धत ही अतिशय रंजक अशी होती. सर्व मित्रमंडळींना आवर्जून बोलावलं जाई, आणि सर्वांना दोन दोन पेग दिले जात असत. अशातच त्यांनी ड्रिंक्सचा ६१ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता. वैशिष्ट्य म्हणजे या ६१ वर्षात एकही दिवस खाडा जाऊ दिला नव्हता. अर्थात फक्त दोन पेग दररोज, आणि पूर्वीचे व्यायामाने कमावलेले शरीर यामुळे हे सर्व ते करू शकले होते. असं एकदम मनमोकळं हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं शेळके काकांचं. जे करायचं ते अगदी उघड उघड, कसलीही लपवाछपवी नाही की कसला आड पडदा नाही. त्यांचे विचार या काळातही फार आधुनिक स्वरूपाचे होते. अंधश्रद्धेला त्यांनी कधीच आयुष्यात थारा दिला नाही. ते पर्यावरण प्रेमी व कलेचेही भोक्ते होते. आजही त्यांच्या घराचे कंपाउंड वॉल वारली पेंटिंग ने सजलेले दिसेल. मनसोक्त मनमौजी आयुष्य जगले आणि ३१ मार्च २०२५ रोजी आयुष्याचा लेखाजोखा पूर्ण करून इहलोकीचा निरोप घेतला. माझे मित्र सुरेश व रमेश या त्यांच्या दोन्ही मुलांनी व सुरेखा या मुलीसह त्यांच्या सर्वच कुटुंबीयांनी शेळके काकांचा दशक्रिया विधी सुद्धा पर्यावरण पूरक पद्धतीनेच पार पाडला. त्यांच्या घरी व केकस्थळवाडी या आजोळी वृक्षारोपण करून त्यांची रक्षा त्या ठिकाणी विसर्जित करण्यात आली. खर तर हा खूप वेगळाच परंतु महत्वपूर्ण पायंडा पाडला आहे. गोड जेवणाच्या दिवशी ही वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यांची रक्षा हे वृक्ष वाढविल व येणाऱ्या पिढ्यांनाही शेळके काकांचे अस्तित्व सावलीच्या आणि फळांच्या माध्यमातून देईल हे एक वेगळेच समाधान सर्वांसाठी असेल.
More Stories
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी