कळंब – ग्रामीण व पारंपारिक कलावंतांच्या समस्येचे निराकरण करून शासनाने स्वयंस्फूर्तीने त्यांचा सन्मान केल्यास पारंपारिक कलेचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी गती मिळेल असा ठाम विश्वास सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ तोडकर यांनी ग्रामीण व पारंपरिक कलावंत परिषदेच्या प्रथम सत्राच्या अध्यक्षीय समारोपात व्यक्त केला. कसबे तडवळे येथील २२,२३ फेब्रुवारी १९४१ रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या महार-मांग वतनदार परिषदेच्या ८४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत संविधान अमृत महोत्सवी वर्षात सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ तोडकर यांच्या एकसष्टी व प्रबुद्ध रंगभूमीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने कळंब येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर संत गाडगे महाराज जयंती निमित्त त्यांच्याही प्रतिमेचे पूजन करून ग्रामीण व पारंपारिक कलावंत परिषद दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी येथे मोठ्या थाटात संपन्न झाली. या परिषदेमध्ये पहिल्या सत्रात भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने,मराठवाडा रेडिओच्या वृत्त निवेदिका सविता मालूरे,गझलकार प्रा.शेखर गिरी, माजी नगरसेवक सुनील गायकवाड,शाहीर राणा जोगदंड, दुसऱ्या सत्रात बालविकास प्रकल्प अधिकारी ताई बोराडे, निर्माता- दिग्दर्शक सिद्धार्थ कांबळे,पत्रकार संभाजी गिड्डे आदी मान्यवरांनी संत गाडगेबाबा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य विशद करून ग्रामीण व पारंपारिक कलाकारांचे महत्त्व विशद केले. सहभागी कलावंतांनी भारुड,अभंग,गवळणी आणि क्रांतिकारी गीते सादर केली. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षीय समारोपात सुभाष घोडके यांनी विश्वनाथ अण्णाचे एकल व परित्यक्ता महिलांसाठी केलेले कार्य विशद करून पारंपारिक कलावंताच्या प्रश्नावर शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.शाहीर राणा जोगदंड यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत गीतामधून स्वागत करत आराधी,भजन,गवळण,भारुड आदी कोणत्याही गीतामधून अंधश्रद्धा,आत्महत्या,व्यसन मुक्तीसाठी परिवर्तनीय रचना सादर करण्याचे कसब सांगून शासनाकडून मिळत असलेल्या सवलती सांगितल्या. बाल विकास प्रकल्प अधिकारी ताई बोराडे यांनी सांप्रदायीकतेसोबत पारंपारिक कलेतून लहान मुलांना महापुरुषांच्या कार्याचे धडे देण्याचे आवाहन केले. शाहीर बंडू खराटे यांनी सर्व महापुरुषावर पोवाडा सादर केला.या परिषदेच्या दुसऱ्या सत्रात संविधान प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात येऊन सहभागी कलावंतांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या परिषदेचे सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत व बंडू ताटे यांनी केले तर आभार प्रा.अविनाश घोडके यांनी मानले. या परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयावर साठ कलावंतांनी आपली कला सादर केली.
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा