धाराशिव (जयनारायण दरक यांजकडून ) – राज्यात सर्वप्रथम अग्रीम विमा वितरणास धाराशिव जिल्ह्यातील ४० महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून नळदुर्ग सह वगळलेल्या इतर १७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम नुकसान भरपाईचे जवळपास ₹ ७० कोटी मिळणार आहेत व ही रक्कम दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी ताकतीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 40 महसूल मंडळातील शेतकऱ्याच्या खात्यात ₹१६१कोटी ८० लाख मागील दोन दिवसापासून जमा होत आहेत. दिवाळीपूर्वी सणासाठी कधी नव्हे ती भरपाईची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त होत आहे. पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यातील सर्वच मंडळामध्ये नुकसान होते. जिल्ह्यातील 40 महसूल मंडळामध्ये पावसाचा 21 दिवसापेक्षा अधिकच खंड पडल्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांनी अग्रीम बाबत आधिसूचना काढली होती, व इतर मंडळातील पीक परिस्थिती विचारात घेऊन उर्वरित 17 महसूल मंडळाची दुसऱ्या टप्प्यात आधिसूचना काढली होती. पहिल्या टप्प्यात जाहीर मंडळातील अग्रीम रकमेचे वितरण सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील 17 महसूल मंडळांना देखील दिवाळीपूर्वीच अग्रीम देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सदरील रक्कम जवळपास ₹७० कोटीपर्यंत आहे. यामध्ये तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग कळंब तालुक्यातील कळंब, ईटकुर, मोहा, गोविंदपुर, भूम तालुक्यातील भूम, वालवड, अभी, पाथरूड, माणकेश्वर, आष्टा, परांडा तालुक्यातील आसू, जवळा, पाचपिंपळा, वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा व उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, या मंडळाचा समावेश आहे. महायुती सरकार शेतकऱ्या प्रती अतिशय संवेदनशील असून विमा कंपन्यांना त्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी