बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होते.चर्चा होते.निषेध मोर्चे निघतात.ठीक ठिकाणी निषेध व्यक्त केले जातात. हे सर्व होत असताना अमानुषपणे केलेली हत्या याच्या संदर्भात एकाही स्वयंसेवी संघटनेने सहभाग निंदविला नाही. कोणीही मत व्यक्त केलं नाही. कोणीही निषेध केला नाही.. बीड जिल्ह्यातील ही अशी एकच घटना नाही.अशा अनेक घटनांसोबत स्त्री भ्रूण हत्या,महिलांची गर्भाशय काढून टाकणे, असे अनेक प्रकार होताना दिसत आहेत. अशा विविध मानवी मूल्य पायदळी तुडवणाऱ्या घटना घडत असताना पुरोगामी महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्था गप्प का? इतकी मरगळ स्वयंसेवी क्षेत्रात कशी आली.अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये नियमित घडत असतांना स्वयंसेवी संघटनांचा आवाज कुठेही उठलेला दिसत नाही.अशा हातबल झालेल्या स्वयंसेवी संघटना त्यांचा आवाज कुठे दबला गेला?कुठे मारला गेला? नेमकी अशी अवस्था का झाली.हा चिंतनाचा विषय मात्र नक्कीच समाजासमोर येतो आहे. माणूस तिथून सारखाच. तो कोणत्या जातीचा आहे? धर्माचा आहे?हा विषय इथे घेन्या सारखा नाहीचय.लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या कोणत्याही घटना कुठल्याही व्यक्ती सोबत अथवा समुहासोबत होऊ द्यात.त्याचा निषेध व्यक्त करणे,कायदेशीर कार्यवाही करायला सरकारला भाग पाडणे,याची जबाबदारी स्वयंसेवी संस्था घेत होत्या. समाजाचा आत्मविश्वास बरोबर घेऊन सरकारवर दबाव गट म्हणून सामाजिक संघटना कार्य करत होत्या.आणि सत्तेत असलेले कोणतेही सरकार स्वयंसेवी संस्थांच्या आवाजाची दखल घेत होते.पोलीस प्रशासन स्वयंसेवी संस्थांच्या आवाजाला प्रतिसाद देत होते.ती आदरयुक्त भीती पोलीस प्रशासनामध्ये होतीच. परंतु सध्या सर्वच वारे उलटे फिरताना दिसते आहे. अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आता स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार दिसत नाही.त्या जबाबदारी पासून दूर गेल्याचे दिसते आहे. स्वयंसेवी क्षेत्रात अशी मरगळ का आली?अशा महत्त्वाच्या कारणांचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे वाटायला लागले आहे.स्वयंसेवी संघटन दुबळ झालं आहे का?नेतृत्व हरल्यासारखे दिसत आहे का?महाराष्ट्रामध्ये तेवढ्या ताकतीचे नेतृत्व आता उरलेले दिसत नाही का?आर्थिक बळ देणाऱ्या मदत करणाऱ्या संस्था आणि लोक उरलेले नाहीत का?अशा घटनेच्या पाठीमागे जात,धर्म आणि राजकारण जोडले जात आहे का? म्हणून कदाचित स्वयंसेवी संस्था त्रयस्ताच्या भूमिकेत उभा राहतांना दिसत आहेत का? मित्रांनो भविष्यातील भीतीचा विचार केला असता,लोकशाहीतिल मानवी मूल्य घेऊन कार्य करणारा गट जेंव्हा अस्थिर होईल, त्रयस्त होईल.तेव्हा येथील धर्मसत्ता आणि राज्यसत्ता माजल्यासारखं वागेल.लगाम सुटलेल्या घोड्यासारखं उधळायला लागेल. अशा माजलेल्या राजशक्तीला लगाम घालण्यासाठी मानवी मूल्य घेऊन समाजासमोर उभा राहणे स्वयंसेवी संघटनांचं काम होतं.ते पुन्हा वाढविण्याची आवश्यकता वाटते.सामाजिक बदलाचे कार्य,सामाजिक परिवर्तनाचे कार्य,आणि समाजावर,समूहावर कोणी अन्याय अत्याचार करत असेल त्यावरती जन अंकुश निर्माण करण्याचे कार्य हे स्वयंसेवी संघटना करत होत्या ते पुढेही वाढवण्याची अत्यंत आवश्यकता आहे असे वाटते.सामाजिक विकासाचे काम करणारे लोक या देशात असणे अत्यंत गरजेचे आहे. नाऊमेद होऊन चालणार नाही.त्यासाठी पुन्हा माणसांचं समूहाचे बळ, संघटन,संस्थांची एकजूट होणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर भविष्य काळामध्ये लोकशाही मूल्य पायदळी तुडवली जातील.माणसांचे जीवन अस्थिर होईल. अल्पसंख्यांक दलित भटक्यांसाठी कोणी काम करणार नाही.आणि पुन्हा सर्वसामान्यांचे शोषण होईल.त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी सजग राहणे, संघटित राहणे,आणि राज्यसत्तेवरती अंकुश निर्माण करण्याची गरज आहे असे वाटते.
More Stories
उमरगा शहर व तालुक्यामध्ये वृक्ष लागवड
आरोग्य क्षेत्रात समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय
शिवपुत्र संभाजी महाराज यांस