June 22, 2025

फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांना प्रदान

  • लातूर – भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था आणि फुले आंबेडकर साहित्य पंचायत, सातारा यांच्या विद्यमाने दिला जाणारा यंदाचा (२०२३-२०२४) फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार जेष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांना देशातील ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या शुभ हस्ते देण्यात आला.
    या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार श्रीनाथ पाटील हे होते. प्रारंभी संस्थेचे कार्याध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
    याप्रसंगी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की,भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेने नेहमीच चांगल्या विचारांची पाठराखन केली आहे.महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांनी समाजासाठी आयुष्य वेचले.त्यांच्या विचारांमुळे समाजातील दुबळ्या घटकामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.
    पुढे बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा वापर हा दीन, दलित व उपेक्षित वर्गासाठी केला. या राजाच नाव अजूनही सगळ्यांच्या तोंडातून निघते. यामुळे राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर लोकांच्या विकासासाठी केला पाहिजे.ज्यांनी समाजासाठी काहीतरी आगळ वेगळं काम केलं, सेवा केली, लिखाण केल अशा व्यक्तींची निवड करून त्यांचा सन्मान करण्याची आमच्या संस्थेची पद्धत आहे. या पुरस्कारामुळे साहित्यिकांना लिखाणाला अधिक बळ मिळेल आणि ते आपल्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये आणखी वेगाने काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार म्हणाले की, महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील पुरोगामी चळवळींना वैचारिक आधार व बळ दिलेले आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी चेहरा प्राप्त झाला. ते सामाजिक क्रांतीचे जनक आहेत. त्यांनी हिंदू समाजाची कठोर चिकित्सा केली. त्यांनी देशातील पुरोहितशाहीला कडाडून विरोध केला कारण त्यांच्या मते पुरोहित शाही बहुजन समाजाला मानवी हक्क व स्वातंत्र्य या पासून वंचित ठेवते आणि बहुजन समाजावर मानसिक व बौद्धिक गुलामगिरी लादते. फुले-आंबेडकरांच्या तत्वज्ञानाच्या आधारेच बहुजन समाजाचा उद्धार होऊ शकतो. फुले-आंबेडकरांनी समता व स्वातंत्र्य या मूल्यांच्या आधारे भारतीय समाजाची पुनर्रचना करण्याचा आग्रह झाला धरला.
    शेवटी ते म्हणाले की, खासदार शरद पवार देशातील प्रतिगामी शक्तीला रोखण्याचे काम करीत आहेत.
    अध्यक्षीय समारोप करताना माजी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की,लक्ष्मण माने यांनी अत्यंत कष्टातून ही संस्था उभी केलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांच्या कामाची नेहमीच दखल घेतली जाते.
    याप्रसंगी संघटनेचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित रामराजे आत्राम आणि युवा साहित्यिक पुरस्काराने सन्मानित विलास माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
    या कार्यक्रमास डॉ.मोहन देशमुख, गंगाधर जगमवाड,सौ.प्रेमा कुंभार, नितीन कुंभार, प्रभाकर देशमुख, सुनील माने, शशी माने, शैलेंद्र माने, नारायण जावलीकर, मच्छिंद्रनाथ जाधव, हरिदास जाधव,संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!