August 9, 2025

संपादकीय …! भारतीय विस्फोटाच्या वाटेवर……!

  • विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाची ३९५ कलम,८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना लिहून जगातील संसदीय लोकशाहीचे पुनरूज्जीवन केले. राज्यघटनेने सर्वांना मूलभूत हक्क, अधिकार आणि कर्तव्य दिली असून सरकारच्या जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या आहेत.
    स्त्री-पुरुषांना, गरीब-श्रीमंतांना एक मताचा अधिकार दिला. स्त्रियांना शिक्षणाचा, नौकरी करण्याचा अधिकार दिला अन्यथा देशातील महिला आजही चूल आणि मूल सांभाळत बसल्या असत्या. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा हक्क दिला, सहा महिन्याची प्रसुती रजा फुल पगारी दिली. चल-अचल संपत्तीवर पुरुषाप्रमाणे अधिकार दिला. रिझर्व बँक, नियोजन आयोग, पंचवार्षिक योजना, जलनीती, नद्या जोड प्रकल्प, भाकरानांगल, दामोदर, सोनाकुंड, हिराकुंड, धरणाची निर्मिती, कामगारांचे १२ घंट्यावरून ८ घंट्यावर काम आणले, आठवड्याची एक सुट्टी दिली. अखंड भारताला जातीयतेतून मुक्त केले. समता, न्याय, स्वातंत्र्य, धर्म निरपेक्ष बंधुता अशी राज्यघटना देऊन अभिव्यक्ती स्वतंत्र दिले. 14 ऑक्टोंबर 1956 ला विजयादशमी अर्थात दसरा दिवशी बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयासह बौद्ध धर्म स्वीकारला. अशोक विजादशमी धम्म अनुप्रवर्तन दिनानिमित्त प्रगत राष्ट्रापैकी अमेरिका आणि भारत यांच्यात तुलना की तर अमेरिकेत देव नाहीना मठ नाही,पण पाऊस मात्र वेळेवर व भरपूर आहे,गेल्या 200 वर्षात दुष्काळ नाही.
    कुठले होमहवन नाही ना कसली वारी नाही.कसले अभिषेक नाही ना ,अनुष्ठानं नाही. हरिनाम सप्ताह नाही ना पारायणे नाहीत.
    अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे. अन्नधान्य विपूल आहे.सुखसोयी विपूल आहेत. कशाचीच कमतरता नाही.
    माणशी 2876 वृक्ष आहेत. भारतात फक्त माणशी 28 झाडे आहेत.
    आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे म्हणतो पण एकही भारतीय झाड लावत नाही,जपत नाही. अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं घर नाही.
    भारतात दारात झाड नाही तर हिरवळ कुठली….स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली ….साधं पिण्याच पाणी देवू शकत नाही.
    अमेरिकेचे क्षेत्रफळ भारता पेक्षा तिप्पट आहे आणि लोकसंख्या आहे 31 कोटी.भारताची आहे 135 कोटी …… 35 कोटीची 135 कोटी झाली …..फक्त 75 वर्षात. एवढीच जबरदस्त प्रगती आहे. भारतात हजारो जाती…. सतराशे साठ धर्म …. कुणाचाच मेळ नाही…. प्रत्येकजण म्हणतो आमचाच देव खरा आमचाच धर्म मोठा…….नाही लेकरांना तोटा.एक मुलगा सांभाळ करने कठीण झाले तरी एकएकाला अनेक लेकरं, बेरोजगाराने भटकत आहेत रस्त्यावर,
    ना शिक्षण ना संस्कार,ना आचार,ना शिस्त
    सगळं बिनधास्त आणी मस्त.
    आताच पिण्यास पाणी नाही तर पुढे काय ? कुणालाही पर्यावरणाची फिकर नाही,निसर्गाची चाड नाही,नुसतेच भरतात कुंभमेळे आणि जत्रा व यात्रा,जमात व धर्माचे मेळे होत आहेत.प्रार्थना केल्या जात आहे.
    एकाही धर्माच्या देवात पाऊस पाडण्याची ताकद नाही.
    ईश्वराशिवाय कुणी महान नाही…. हे ऐकुण ऐकुण मला 61 वर्ष झाली….. दरवर्षी तेच. पाऊस नाही पडलाच तर पिकाला भाव नाही, शेतकरी पाऊस पडला तरी आत्महत्या करतो नाही पडला तरी आत्महत्या करतो.
    सगळंयाना आरक्षण पाहीजे म्हणता म्हणता आरक्षण 100%होण्याची वेळ आली तरीही काही मिळनार नाही.
    वित्तमंत्री सितारामन यांनी संसदेत सांगीतले की, देशातील 1 लाख 60 हजार कंपन्या बंद झाल्या.सहाकोटी लोक बेरोजगार झाले.
    नोक-याच नाही तर आरक्षण घेवून काय चाटायचे.आता नोक-याच बंद होत आहेत.आहे त्या नोकरांनाच पगार देण्याची व देशाचा विकास करण्याची ताकद सरकारमध्ये नाही.
    सगळा पैसा आमदार खासदार यांच्या सेवा सवलती व पेन्शन मध्येच संपत आहे.
    सबका विकास जावून भारत बनेगा भकास असं दिसत आहे.निवडणुकावरचा विश्वास उडाला आहे. मॅचच फिक्स असेल तर खेळायचेच कशाला.
    जनता दिशाहीन झाली आहे.स्वप्न राखेत मिसळली आहेत. संविधान नावांला उरले आहे.चौकशी शिवाय अटक असा न्याय झाला आहे. प्रचंड महागाईने जनता मरणप्राय झाली आहे.तरी सरकार डिझेल पेट्रोलचे दर वाढवतच आहे.दवाखाना कुटूंबाचे दिवाळं काढत आहे. जनतेला लुटण्यासाठी लुबाडण्यासाठी सरकार सहीत असंख्य गिधाडे सरसावली आहेत.
    चिंता व ताणतणावाने अर्धा भारता मधुमेह ग्रस्त झाला आहे.30% लोकांना रक्तदाब आहे.
    शेतात काम करायला मजूर नाही.अंगमेहनतीला माणुस नाही.
    सगळे बिनकामाची माणसं आहेत.नवरा साहेब व बायको मॅडम झाल्या आहेत.स्वयंपाकाला बाई,भांडी व धुण्याला बाई.
    तरी मॅडमची सतत पाठ व कंबर दुखते आहे
    आणि साहेबांना टेकल्याशिवाय बसता येत नाही.कुंभ मेळ्यात 10,000 सुशिक्षित व उच्चशिक्षित लोकांनी साधूची दिक्षा घेतली आणि आता रस्त्यावर भटकत आहेत. विरक्त झाले आहेत. लग्नाचे वय टळून गेले आहे. बायका मिळत नाहीत. गांवागावांत किमान चाळीस पन्नास पोरं बिन लग्नाची आहेत. भयंकर विदारक परिस्थिती आहे.
    बाजारात फळे कृत्रिमरीत्या पिकवून विकत आहेत. मराठी शाळा बंद पडल्या आहेत. मुलांना धड इंग्रजी येत नाही आणि मराठी येत नाही.मराठी इंग्लिश मिक्स बोलत आहेत. टिव्ही वरच्या मालिका अर्धनग्न झाल्या आहेत. गुन्हेगारी जास्त दाखवत आहे.मुलं लहानपणापासूनच हिसंक होत आहेत.
    13 व्या वर्षीच मुलंमुली पळून जात आहेत. दारू कितीही महाग केली तरी त्यासाठी रांगा लागत आहेत.प्रार्थना स्थळे लुटीची ठिकाणं झाली आहेत. वृद्धाआश्रमाची संख्या झपाट्याने वाढत आहेत.तो एक मोठा व्यवसाय होवू पहात आहे.
    आईला बाळासाठी वेळ नाही. पाळणाघरे वाढत आहेत. मुलगा-सुनांना सासुसासरे नकोसे झाल्याने अनाथालये वाढत आहेत.भारतिय संस्कृती चा पार बट्याबोळ झाला आहे.
    माणसं पदोपदी खोटं बोलत आहेत. खोटं बोलणच खरं मानलं जात आहे.चोरांना,लबाडांना प्रतिष्ठा मिळत आहे. सज्जनांना वेड्यात काढत आहेत.लोकशाही,समता, बंधुता, स्वातंत्र्य हे फक्त वाट्सअपचे संदेशा पुरतीच मर्यादित झाली आहे.
    चांगले वागण्याचे करोडो मेसेज रोज फिरत आहेत.प्रत्येक जण चांगलं वागा म्हणत आहे तरीसुद्धा आज ही सुना राॅकेल टाकुन जाळल्या जात आहेत.
    साहित्यीक मारले जात आहेत. छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापुर्वी साहित्यकांना उत्तम लिखाणासाठी कोटी रूपया पर्यंत मानधन दिले होते आज साहित्यीक्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे.
    एकंदरीत भारत विस्फोटाचा व उद्रेकाचा ज्वालामुखी बनत आहे.
    सा.साक्षी पावनज्योतच्या असंख्य वाचकांना अशोका विजयादशमी अनुप्रवर्तन दिनानिमित्त हृदयपूर्वक मंगलमय सदिच्छा .
  • जय शिवराय – जय भीम
  • – सुभाष द.घोडके
    संपादक
    सा.साक्षी पावनज्योत, कळंब
    संपर्क – 9960187059
error: Content is protected !!