June 19, 2025

चिखली चौरस्ता येथे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

  • धाराशिव (जिमाका)- आशियाई विकास बँक अर्थसाहित प्रकल्प ३ अंतर्गत धाराशिव तालुक्यातील कळंब- ढोकी- तेर- बेंबळी- तुळजापूर – अक्कलकोट राज्य मार्गावरील तेर ते तुळजापूर दरम्यानच्या 42 किमी लांबीच्या रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामाचे भूमिपूजन दि. ११ ऑक्टोबर रोजी रोजी धाराशिव तालुक्यातील चिखली चौरस्ता येथे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
    मंत्रालयातून या ई- भूमिपूजन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर व ब्रिजेश दीक्षित यांची तर चिखली चौरस्ता येथे आयोजित कार्यक्रमस्थळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,माजी जि.प.उपाध्यक्ष सुधाकर गुंड,धाराशिव पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी गावडे,नितीन काळे,मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण व उपविभागीय अभियंता आव्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • रस्त्याचे भूमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले,जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू होणार आहे.जिल्ह्यात पर्यटन वाढीला चालना देऊन त्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती कशी होईल यावर भर देण्यात आला आहे. तुळजापूर येथे जवळपास २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून तुळजापूरचा कायापालट होणार आहे.भक्तनिवास व इतर सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.तेर येथे संत गोरोबा काकांच्या मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे या मंदिराचा कायापालट होणार आहे.तेर गावाच्या विकासाची नियोजन केले असून तेथे असलेल्या प्राचीन वास्तूंचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे असे ते म्हणाले.
    राज्य सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी दिला असल्याचे सांगून आमदार राणाजगजितसिंह पाटील पुढे म्हणाले,अनेक वर्षापासून रेंगाळलेली मोठी अनेक कामे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतीच्या विकासात पाण्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.तत्कालीन मंत्री डॉ.पदमसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीतून जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प कार्यान्वित झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे.त्यामुळे आज ३० पेक्षा जास्त साखर कारखाने आणि गुळ पावडरचे युनिट जिल्ह्यात सुरू झाले आहे.आणखी काही युनिट नव्याने सुरू होणार आहे.नागरिकांच्या जीवनशैलीत बदल होऊन अर्थकारणात फरक पडला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यात तुळजापूर तालुक्यातील रामदरा येथे येणार आहे. कृष्णा खोऱ्यातील आपल्या हक्काचे पाणी जिल्ह्यातील आठही तालुक्यात येणार आहे.जिल्ह्यात रेल्वेचे काम सुरू झाले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशीव येथे सुरू झाले आहे.यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
    या कार्यक्रमाला चिखली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण यांनी केले.संचालन श्रीमती वृषाली तेल्लोरे यांनी तर उपस्थितांचे आभार उपविभागीय अभियंता आव्हाडे यांनी मानले.
error: Content is protected !!