June 21, 2025

शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय महत्वाचा – राज्यपाल हरिभाऊ बागडे

  • धाराशिव (जिमाका) – देशात खाजगी साखर कारखान्यांची सुरुवात स्वातंत्र्यापूर्वी झाली. सहकारी साखर कारखाने सुरू करणाऱ्यांनी खाजगी साखर कारखाने सुरू केले.आज रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचा पोत बिघडत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू करावा.दुधाळ जनावरांपासून मिळणाऱ्या शेण खतामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल श्री. हरिभाऊ बागडे यांनी केले.
    दि. २८ सप्टेंबर रोजी कळंब तालुक्यातील साईनगर रांजणी येथे नॅचरल शुगर अँड अलाईट उद्योग समूहाच्या उभारणीला २५ वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना २५ टक्के लाभांश वाटप राज्यपाल श्री.बागडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक कृषिरत्न भैरवनाथ ठोंबरे होते.यावेळी दामूअण्णा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • श्री बागडे पुढे म्हणाले,श्री.ठोंबरे यांनी साखर कारखान्यापुरते मर्यादित न राहता त्या माध्यमातून विविध उत्पादनाला सुरुवात केली आहे.त्यामुळेच अनेकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.आपल्या या कारखान्यासोबतच इतरही कारखान्यांना ठोंबरे यांची मदत होत आहे.जे काम स्वीकारले ते यशस्वीपणे केले पाहिजे,असे ते म्हणाले.
  • श्री ठोंबरे आपल्या प्रास्ताविकातून बोलताना म्हणाले,नॅचरल शुगर उद्योग समूहाचे ३२ प्रकल्प कार्यरत आहे. ४१० कोटी रुपयांची गुंतवणूक यामध्ये झाली आहे.१०५९ कोटी रुपयांची यावर्षी वार्षिक उलाढाल झाली आहे.या उद्योग समूहाशी दीड लाख कुटुंब जुळले आहे.२२ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांचे ८० हजार लिटर दूध दररोज संकलित केले जाते.या दुधापासून विविध उत्पादने तयार करण्यात येतात.शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम हा उद्योग समूह करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
  • यावेळी श्री. बागडे यांच्या हस्ते सौ मंगल डायरे,विठ्ठल कसबे,प्रभा आव्हाड, काशिनाथ आगळे,शेख अकबर व यशवंत बिडवे या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २५ टक्के लाभांश वाटप करण्यात आले. साहेबराव आव्हाड या शेतकऱ्याला मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवेचा निकाल लागून तालुक्यातील घारगाव येथील डॉ.महेश घाटूळे हा राज्यात प्रथम येऊन त्याची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल श्री.बागडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी राज्यपाल श्री.बागडे यांच्या हस्ते वार्षिक अहवालाचे विमोचन करण्यात आले.कार्यक्रमाला नॅचरल शुगर उद्योग समूहाचे संचालक, प्रवर्तक व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!