August 9, 2025

कुलगुरू प्रमोद येवले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कृतज्ञता समारोह सोहळा संपन्न

  • धाराशिव – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.प्रमोद येवले यांच्या सेवा निवृत्ती निमित्त प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने कृतज्ञता करण्यात समारोह आयोजित करण्यात आला. कुलसचिव प्रा. डाॅ. भगवान साखळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डाॅ.अंकुश कदम,विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ. प्रशांत दीक्षित आदि व्यासपीठावर उपस्थित होते. उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कुलगुरु प्रा.डाॅ. प्रमोद येवले यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या झालेल्या नेत्रदीपक प्रगती विषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.विद्यापीठात व उपपरिसरात आधारभूत संरचना विकसित करणे, कोविड लॅब उभा केल्या मुळे नैसर्गिक आपत्तीच्या कालात रूग्णांना सेवा देण्याची संधी मिळाली, शैक्षणिक विभागांना जागा उपलब्ध करून देण्यात आली, ऑनलाईन मूल्यमापन प्रयोग राबविण्यात आला, फाईल ट्रेकिंग सिस्टीम अंमलात आणल्यामुळे विद्यापीठात प्रशासकीय शिस्त आणता आली, गुणवत्तापूर्ण शिक्षण व संशोधनाला सातत्याने प्रोत्साहन दिले.
    विद्यापीठाचे कुलगुरू यांचा सेवानिवृत्ती निमित्त विद्यापीठ उपपरिसराच्या वतीने कृतज्ञता समारोहाचे अध्यक्ष प्रा.डाॅ. भगवान साखळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुलगुरू प्रा. डाॅ. प्रमोद येवले यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात त्यांनी म्हटले की, समाज विद्यापीठाशी जोडलेला आहे. विद्यापीठात आधारभूत संरचना विकसित केली. विद्यापीठ प्रवेश द्वारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रतिष्ठापना, दोन कोविड लॅबची उभारणी, विश्रामगृह, उपहारगृह इमारत, विज्ञान इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्याचे कार्य पुर्ण करून शैक्षणिक विभागांना पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आली, गुणवत्तापूर्ण शिक्षण व संशोधनासाठी मार्गदर्शन केले व पाठबळ दिले, समतोल विकास साधण्याचे प्रयत्न केले. माझे यश हे एकट्याचे नाही. माझ्या सर्व सहकाऱ्यांचे यश आहे. समूह कार्य महत्वाचे आहे. लोकांनी संकुचित राजकारण दूर करून विकासासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. आपापसातील हेवेदावे, मत्सर, द्वेष यांमुळे विकास कार्यात अडथळे निर्माण होतात. मराठवाडा हि संताची भूमी आहे, या भूमीचे सेवा करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांना भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या. सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन नाट्यशास्त्र व लोककला विभागातील डाॅ. गणेश शिंदे यांनी मानले. जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख जितेंद्र कुलकर्णी यांनी मान्यवरांचे व कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!