धाराशिव (जिमाका) – ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत,त्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करुन देण्याऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.
विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमांतून ग्रामीण भागातील पशुपालक,शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द असलेल्या शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने वैयक्तीक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे.
सन 2021-22 पासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सुध्दा ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.यामध्ये शासनाने एखाद्या योजनेंकरीता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी सन 2021-22 पासून पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे.त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे.त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केंव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरीता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे,1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे,100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 + 3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2023-24 या वर्षात राबविली जाणार आहे.पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पशुपालक,शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील http://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच अँड्राईड मोबाईलवरील AH.MAHABMS या ॲपवर उपलब्ध आहे.अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच 15 डिसेंबरपर्यंत स्विकारले जातील.या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ आहे.अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल.बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरीता स्वत:च्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा.अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0148 या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपायुक्त कार्यालय,तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी