धाराशिव (जिमाका) – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित्त केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने केंद्र शासनाने सन २०१५ मध्ये “स्टँडअप इंडिया” ही योजना जाहीर केली असून,या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सवलतीस पात्र नवउद्योजकांनी १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर आणि संबंधित बँकेने अर्जदारास ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के रक्कम फ्रंट एन्ड सबसिडी स्वरूपात राज्य शासनामार्फत देण्यात येते.ही सवलत स्टँडअप इंडिया योजनेत पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्याने अनुदानासाठी आयुक्त,समाज कल्याण,महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या नावे विहीत नमुन्यात मागणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.तसेच या अर्जासोबत उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र,जात प्रमाणपत्र,बँकेचे कर्ज मंजुरी पत्र, बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प अहवालाची प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. वरील अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र नवउद्योजकांनी अधिक माहितीसाठी व अर्ज प्रक्रियेसाठी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धाराशिव,सचिन कवले यांनी केले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान