कळंब – कळंब येथील पवित्र हजरत ख्वाजा हामीद अली शाह (र.अ.)दर्ग्यावर १५०० वा जश्ने ईद-ए-मिलादुन नबी व १३ वा उर्स मुबारक हा तीन दिवसीय ऐतिहासिक उरुस सोहळा मोठ्या श्रद्धा,उत्साह आणि शान-शौकतीने संपन्न झाला. महाराष्ट्र,मध्यप्रदेश,कर्नाटक, तेलंगणा,विदर्भासह विविध राज्यांतून हजारो भाविकांनी उपस्थित राहून दरगाहातील आध्यात्मिक वातावरणाचा लाभ घेतला. सोहळ्याची सुरुवात १२ सप्टेंबर रोजी गुस्ल विधीने झाली.१३ सप्टेंबर रोजी ध्वजारोहण, संदल अर्पण व चिराग प्रज्वलनानंतर सुप्रसिद्ध कव्वाल मंडळांच्या महफिलींनी दरगाह परिसर दुमदुमून गेला. १४ सप्टेंबर रोजी ख्वाजगान पठण सभा पार पडली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.दर्ग्याचे सज्जादानशीन हजरत डॉ.शाह ज़ाकिर हामिद (मदझिल्लाहु अली) यांनी शांती,मानवता, भाईचारा व सद्भावनेचा संदेश दिला. तसेच हैदराबाद येथील हजरत अनवरुल्लाह हुसेनी (मदझिल्लाहु अली) यांच्या मार्गदर्शनातून भाविकांना मौलिक आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.
दरगाह परिसरात तीनही दिवस पहाटेपर्यंत कव्वालींचा आनंद भाविकांनी घेतला.१५ सप्टेंबर रोजी झालेल्या फातेहा प्रार्थनेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. यावेळी कळंब तालुक्याचे पोलीस निरीक्षक चिंतले व त्यांच्या सहकाऱ्यांनी दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले व त्यांचा मान्यवरांसह सत्कारही करण्यात आला. भाविकांच्या सोयीसाठी दरगाह व्यवस्थापन समितीने राहण्याची, भोजनाची व इतर आवश्यक सोयींची उत्तम व्यवस्था केली होती. २४ तास सुरू असलेल्या लंगरमुळे सर्व भाविकांना भोजनाची सुविधा उपलब्ध झाली. दरगाह परिसर रोषणाई व सजावटीने उजळून निघाला होता. भाविकांचा जयघोष,कव्वालींचा नाद आणि आध्यात्मिक वातावरणामुळे हा उरुस सोहळा भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरला.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन