August 8, 2025

नवोदितांचे साहित्य प्रकाशनासाठी प्राधान्य – सुभाष घोडके

  • कळंब – दीड दिवस शाळा शिकलेले लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी अनेक लोकनाट्ये,पोवाडे,३५ कादंबऱ्या, १५ नाटके,१०० हून अधिक कथा आणि हजारो शाहिरी गीते लिहून दर्जेदार साहित्याची अमूल्य खाण निर्माण केली आहे.त्यांच्या किमान पाच कादंबऱ्या विद्यार्थ्यांनी वाचल्या,तरीही त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळेल,असा विश्वास साक्षी पावनज्योत या साप्ताहिकाचे अधिस्वीकृतीधारक संपादक सुभाष द.घोडके यांनी व्यक्त केला.
    नवोदितांचे साहित्य सुसंस्कारित करून त्याचे प्रकाशन करण्यास प्राधान्य दिले जाईल,असे ठोस आश्वासन त्यांनी अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपातून दिले.
    स्व.वसंतराव काळे संगणकीय महाविद्यालयात दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष घोडके होते.
    प्रमुख पाहुणे म्हणून महादेव महाराज अडसूळ यांनी विद्यार्थ्यांनी लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन लिहिण्याच्या वाटेवर यावे,असे उदाहरणांसह प्रभावी मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून प्राचार्य डॉ.एल.एम.थोरात यांनी डॉ.साठे आणि लोकमान्य टिळक यांचे कार्य अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने उलगडून दाखवले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजय लाटे यांनी केले.
    या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये पत्रकार परमेश्वर खडबडे,नमस्ते धाराशिवचे संपादक संदीप कोकाटे,प्रा.माने, प्रा.पाटील,प्रा.गरड मॅडम,प्रा. सोनवणे मॅडम आदी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!