धाराशिव – भारत देशाची निर्मिती बौद्धांनी केली आहे. त्यानंतर भगवान महावीर यांनी जैन यांनी देखील धर्माचा प्रचार केला.मात्र तथागत गौतम बुद्धांचा प्रभाव इतका होता की जैन धर्म बाजूला गेला. या देशाचा इतिहास ह्युयान यासह तीन बौद्ध यात्रेकरूंनी लिहिला आहे. सम्राट अशोकाने प्रत्येक बौद्ध स्थळांना भेटी देऊन त्याचा नकाशा बनविला होता. ब्रिटिशांनी त्या नकाशाच्या आधारे बुद्ध विहारी व लेण्या शोधून काढून त्या जगासमोर आणल्या आहेत. मात्र या बौद्धांच्या विहारे व लेण्यांवर ज्या लोकांनी काहीही निर्माण न करता केवळ पूजापाठ केली, यज्ञात पशूंची हत्या केली, त्यांनी कब्जा घेतला असल्याचा खळबळजनक आरोप भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी दि.१८ मे रोजी केला.
धाराशिव शहरातील नगर परिषदेच्या शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित भारतीय बौध्द महासभेच्यावतीने भव्य बौध्द धम्म परिषदेत ते बोलत होते. यावेळी धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हाध्यक्षा राजश्री कदम प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. एस.के. भंडारे, महाराष्ट्र अध्यक्ष यु.जी. बोराडे, राज्य सरचिटणीस अशोक केदारे, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब वाघमारे, नागसेन माने, हणमंत प्रतापे, अॅड. दिलीप निकाळजे, अॅड. किशोर पायाळे, भिक्खु संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भन्ते महावीरो थेरो, भिक्खु संघाचे सदस्य सारिपुत्त थेरो, तगर भूमीचे संस्थापक अध्यक्ष भन्ते सुमेधजी नागसेन आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘बौध्दगया महाबोधी महाविहार आणि प्राचीन बौध्द तीर्थक्षेत्रे इतिहास व सद्यस्थिती’ या विषयावर बोलताना डॉ. यशवंतराव आंबेडकर म्हणाली की, बौद्धांचा इतिहास सांगितला जात नाही. कारण ओबीसी समाजाचे लोक पुन्हा बौद्ध बनतील अशी भीती येथील प्रस्थापितांना असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करावे यासाठी गेल्या ९५ दिवसांपासून महाबोधी विहार येथे आंदोलन सुरू आहे. तिकडे मीडिया साधा फिरकला देखील नाही. तसेच केंद्र व राज्य सरकार देखील त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्या विहाराचे ऐतिहासिक पुरावे असताना देखील ते ताब्यात दिले जात नाही. तर, उलट अयोध्या येथील राम मंदिराचे कुठलेही पुरावे नसताना व खोदकामामध्ये तथागत गौतम बुद्ध व सम्राट अशोक यांचे ऐतिहासिक शिल्प सापडलेली असताना देखील बहुसंख्यांकाच्या बळावर त्या ठिकाणी राम मंदिर बांधले असल्याचे सांगत जाती धर्माला बघून न्याय दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. विदेशातील पर्यटकांपैकी ७० टक्के पर्यटक हे बौद्ध वास्तू पाहण्यासाठी येतात. सांचीचा स्तूप सम्राट अशोकाने एक दगड दुसऱ्या दगडाला लॉक पद्धतीने बांधकाम करून निर्माण केला असून तो कसा बांधला ? हे पाहून ते आश्चर्य चकित होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिमांनी देखील या देशावर सातशे वर्षे राज्य केले असून त्यांच्या पूर्वजाच्या जमिनी आहेत. वक्फ कायद्याच्या माध्यमातून बहुमताच्या जोरावरती त्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्म क्रांती केली ती आपल्यासाठी पवित्र आहे. मात्र तेथील काही गद्दारांना आपल्या हाताशी धरून पैसा पाणी देऊन त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्यातील गद्दार कोण ओळखण्याची गरज असल्याचे सांगत २०१४ पासून धोका बाबासाहेबांनी उपाय दिलेले आहेत त्या मार्गाचा अवलंब करावा. त्यासाठीच जास्तीत जास्त संख्येने बाबासाहेबांनी आपणाला दिलेल्या भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल या संस्थांमध्ये मोठ्या संख्येने सामील होऊन एकी दाखवायला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.बाबासाहेबांच्या क्रांतीमुळे तुमची प्रगती झाली आहे. घर चलो अभियान सुरू करणार असून त्यासाठी आर्थिक, धार्मिक दान व योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच बाबासाहेबांनी क्रांती करून तुम्हाला शून्यातून शिखरावर पोहोचविले आहे. मात्र येथील राज्यकर्ते शिक्षणाचे खाजगीकरण, नोकरीमध्ये कंत्राटीकरण अशा धोरणांच्या माध्यमातून चारूबाजूंनी आपल्यावर हल्ले करीत आहेत. आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला एकजुटीने सगळ्यांचा सामना करावे लागेल त्यासाठी सामाजिक राजकीय संघटनांना बळ दिली तर ते प्रश्न सोडविता येतील असे त्यांनी सांगितले. एका समाजाच्या विकासामुळे देश पुढे जाऊ शकत नाही असे सांगत स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त अमृत महोत्सव साजरा करणाऱ्यांनी देश मागे नेला. कारण यांच्याकडे संस्कृतीच नसल्याचा घनाघातही त्यांनी केला. विशेष म्हणजे अधिवेशनाच्या माध्यमातून धम्माचा देश वाढवा, कट्टरता नसलेला समतेचा विचार, धम्माचा विचार द्या, पंचशील, करुणा भाईचारा वाढवा प्रज्ञा शील मार्गाचा अवलंब करीत मार्गस्थ व्हा कितीही संकटे आली तरी ती दूर करू शकतो असे सांगत कोणाच्या कुबड्या घेण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभा रहा व स्वाभिमानी व्हा असे कळकळीचे आवाहन डॉ आंबेडकर यांनी केले. यावेळी यु.जी. बोराडे एस.के. भंडारे, भन्ते सुमेधजी नागसेन आदींसह इतरांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक विजय बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन उमाजी गायकवाड यांनी व उपस्थितांचे आभार गुणवंत सोनवणे यांनी मानले. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस धूप, दीप व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भन्ते महावीरो थेरो यांनी धम्मदेशना दिली. यावेळी धम्म उपासक, उपासिका यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे पदाधिकारी व सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धम्मपरिषदेनिमित्त भीमनगर येथील बुद्ध विहारातून महामानवास अभिवादन करून क्रांती चौकातून धम्म रॅली व पथ संंचलन करण्यात आले. ही रॅली मारवाडी गल्ली, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस, त्रिसरण चौक, अंबाला हॉटेल चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, संत गाडगेबाबा महाराज चौक, महात्मा फुले चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे नाट्यगृहात या रॅलीचा समारोप करण्यात आला. दरम्यान सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर यार रॅलीमध्ये युद्ध नको, बुद्ध हवा… चलो बुध्द धम्म की ओर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, संत गाडगेबाबा, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा जयघोष करण्यात आला.
More Stories
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी