धाराशिव (जिमाका) – जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्यावतीने यावर्षी जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन २४ व २५ मार्च दरम्यान करण्यात आले. या ग्रंथोत्सवामध्ये २४ मार्च रोजी सुप्रसिद्ध गझलकार भागवत घेवारे यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कवी संमेलन संपन्न झाले.या कवी संमेलनाची सुरुवात करताना वरील गझलेने त्यांनी कवी संमेलनाची सुरुवात केली.कवी संमेलनात जिल्ह्यातील अनेक मान्यवर कवींनी सहभाग नोंदविला.वेगवेगळ्या विषयाच्या आणि आशयाच्या दर्जेदार कवितांचे सादरीकरण या कवी संमेलनात झाले. कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून कविता सादर करताना आनंद वीर यांच्या “ना कुछ बोया, ना कुछ खोया फिर भी फल तुम चाहते हॊ,चांद से रोशन होकर प्यारे उसपर दाग है, कहते हॊ..” या कवितेला रसिकांनी भरभरुन दाद दिली.माणसाच्या एकूणच जडणघडणीत पुस्तकाचं महत्व सांगाताना करताना कवी संजय धोंगडे यांनी आपल्या पुस्तक या कवितेतून *मन-मेंदू पोसते पुस्तक* *मनगट मजबूत करते पुस्तक* *कळ सोसते बळ देते पुस्तक* *विचार देते चरित्र घडविते पुस्तक* अशाप्रकारे पुस्तकाचे महत्व विशद केले. मानवी समाज जीवनात वेदना या आटळ आहेत,परंतु त्या वेदनांशी मैत्री करून जीवन जगता आले तर जीवन आनंदाने व किती छान पद्धतीने जगता येऊ शकते हे कवयित्री सुवर्ण शिनगारे यांच्या कवितेतून त्यांनी दाखवून दिले, “वेदनांनी मजसवेच जरी दोस्ती केली मी हसत खेळतच मग त्यासवे मस्ती केली… ” इतक्या सहजपणे दुःखाला पचवता येते हे शिनगारे यांनी आपल्या कवितेतून नेमकेपणाने मांडले. कवयित्री अलका सपकाळ भूमवरून या कवी संमेलनात सहभागी झाल्या होत्या,त्यांनी “सरत्या वर्षा सारख्याच आयुष्याच्या कलतं जाणाऱ्या सावल्या,तिच्या चिरेबंदी देहाला भगदाड पाडत,मार्गस्थ होतात. मावळतीला तेव्हा…” ही कविता सादर करून स्त्री जीवनाचे भावविश्व उलगडून दाखविले.कवयित्री अश्विनी धाट यांनी, “सगळेच पुरुष नसतात सारखे..” ही कविता सादर करून पुरुषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले. कवयित्री मनिषा थडवे यांनी विचारप्रवृत्त करायला लावणारी कविता सादर केली त्यांच्या, “उघडलंच होतं रे मी शेवटी दार तुझ्यासाठी गेलास का असाच निघून? थांबला नाहीस माझ्यासाठी?..” या कवितेने मानवी प्रवृत्तीचे नेमके दर्शन घडविले. कवी शेखर गिरी यांची “सात वाजल्यानंतर..” ही गझल रसिकांमध्ये हास्यकल्लोळ निर्माण करणारी ठरली.कवी डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी तिच्या पायातली वाट रोज रानात पोचते विळा हातात घेऊन उभी दसकट वेचते…. ही आईच्या कष्टाची जाणीव करून देणारी कविता सादर केली.या कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली. या कवी संमेलनात डॉ.संजय सोनटक्के,मनिषा थडवे,डॉ.अस्मिता बुरगुटे,शंकर खामकर,कविता पुदाले, युसुफ सय्यद,आश्रुबा कोठावळे, ॲड.जयश्री तेरकर,विजय गायकवाड मिना महामुनी,सुषमा सांगळे,कृष्णा साळुंखे, रमेश मंमाळे,भूमिपूत्र वाघ, तु.दा.गंगावणे,सोनाली अरडले, संध्याराणी कोल्हे या निमंत्रित कवी बरोबरच कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणारे धाराशिव शहर आणि परिसरातील डॉ.शिवाजी गायकवाड,मनीषा पोतदार,प्रतीक कांबळे,अविनाश मुंडे,जयश्री फुटाणे, सुरभी भोजने,सोपान पवार,अरुण कांबळे,डॉ.प्रवीण सोलनकर आदी कवींनी आपल्या कविता कवी संमेलनात सादर केल्या. या सर्वच मान्यवर कवींच्या काव्य सादरीकरणाबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन्मान चिन्ह सन्मानपत्र व ग्रंथ भेट देऊन कवींना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मंचावर कवी संमेलन अध्यक्ष भागवत घेवारे ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे,सुप्रसिद्ध गझलकार युवराज बप्पा नळे तसेच जिल्हा ग्रंथालयाचे संघाचे अध्यक्ष व.ग.सूर्यवंशी,जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे उपस्थित होते.कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ.अरविंद हंगरेकर यांनी तर आभार आनंद वीर यांनी मानले.या कवी संमेलनाला धाराशिव जिल्हा आणि परिसरातून रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
बियाणे न उगवल्याने शेतकरी संकटात,आमदारानी दिला शेतकऱ्यांना आधार
दर्जेदार शिक्षण,उत्कृष्ट जेवण आणि उत्तम राहण्याची व्यवस्था – अरुण घोगरे
मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने पृथ्वीराज चिलवंत यांचा वाढदिवस साजरा