कळंब – कळंब तालुक्यात गेल्या वर्षी दि.२८ मार्च व २५ मे २०२४ मध्ये हवामान बदलामुळे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे कळंब तालुक्यातील नायगाव, खामसवाडी,येरमाळा या भागात चक्रीवादळ व पावसामुळे अनेक नागरिकांच्या घराचे नुकसान झाले होते.त्यामुळे संबंधित लाभधारकांनी तलाठी व तहसील कार्यालयाकडे अनुदान मिळण्यासाठी पंचनामे करून अनुदानाची मागणी करण्यात आली होती.परंतु जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा अद्यापही लाभधारकांच्या खात्यात सदरील रक्कम जमा न झाल्यामुळे श्रमिक मानवाधिकार संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांच्या नेतृत्वाखाली दि.१२मार्च २०२५ रोजी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हवामान बदलामुळे वादळी वारे व पावसामुळे पडझड झालेल्या नागरिकांनी तलाठी व तहसिलदार यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केली होती.त्या मागणीनुसार व नैसर्गिक आपत्ती विभागाच्या दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी च्या पत्रानुसार कळंब तालुक्यातील खामसवाडी येरमाळा व नायगाव येथील नागरीकांना प्रत्येक ४ हजार रुपये प्रमाणे ८० हजार रुपये मंजूर झाले आहेत.परंतु सदरील नुकसान भरपाई हे गेल्या चार महिन्यापासून वाटपाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे सदरील घटनेला जवळपास ११ महिन्याचा कालावधी लोटून गेला असून सुद्धा नैसर्गिक आपत्ती विभाग तहसील कार्यालय याकडे डोळेझाक करत आहे तर मौजे नायगाव,खामसवाडी,येरमाळा या गावच्या तलाठी,ग्राम महसूल अधिकारी यांनी कर्तव्य व कामात कसूर केल्यामुळे तालुक्यातील २० लाभार्थ्यांना प्रत्येकी ४ हजार रुपये असे एकूण ८० हजार रुपये वाटप केले नसल्याने ते तात्काळ सदरील लाभधारकांना वाटप करण्यात यावे अन्यथा वाटप न केल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे,मानव अधिकार आंदोलनचे हनुमंत पाटुळे,सौ.माया शिंदे,राजेंद्र कसबे,दिलीप खलसे मोहन कसबे जुलैखा शेख यांच्या स्वाक्षरी आहेत.
हवामान बदलामुळे व वादळी वाऱ्यामुळे गेल्या वर्षी झालेल्या चक्रीवादळ व पावसामुळे पडझड झालेल्या घरांची नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी तलाठी,ग्राम महसूल अधिकारी सज्जा येरमाळा,खामसवाडी,नायगाव यांना तहसीलदार यांनी दि.८ जानेवारी २०२५ रोजी पत्र काढून या पत्रामध्ये आधार कार्ड,पॅन कार्ड,व बँक पासबुक हस्तगत करून तहसील कार्यालयाला जमा करावे असे तहसीलदार यांच्या आदेश पत्रात असताना सुद्धा सबंधित तलाठी व ग्राम महसूल अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्यामुळे सदरील नागरीकांना अद्याप ही नुकसान भरपाई वाटप झाली नसल्याने संबंधितांनी कर्तव्य व कामात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठांकडुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
— भाई बजरंग ताटे (श्रमिक मानवाधिकार संघ संस्थापक अध्यक्ष)
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे