June 20, 2025

राज्यात माथाडी कायदा राहणार व कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागवार बैठका घेणार –कामगार मंत्री ना.आकाश फुंडकर

  • मुंबई – माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणार व लवकरच विभागवार बैठका घेण्यात येतील असे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी माथाडी कामगार नेत्यांचे बैठकीत केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी प्रसिद्धीस दिली.
    महाराष्ट्र राज्य माथाडी कायदा बचाव कृतीसमितीचे विनंती वरून,मुंबई येथील सह्याद्री विश्राम गृहावर सोमवार दि.२४ फेब्रुवारी रोजी आयोजित बैठकीत कामगार मंत्र्यांनी आश्वासन दिले.
    बैठकीस माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव,सरचिटणीस साथी सुभाष लोमटे,उपाध्यक्ष डॉ. हरीश धरटव,साथी विकास मगदूम,कोषाध्यक्ष साथी हुसेन पठाण,साथी गोरख मेंगडे,मुंबई माथाडी कामगारांचे नेते बळवंतराव पवार,अविनाश रामिष्ट्ये,पोपटराव देशमुख, प्रकाश पाटील,अरुण रांजणे , तसेच राज्याचे प्रधान कामगार सचिव डॉ.आय.ए.कुंदन, कामगार आयुक्त डॉ.एच.पी. तुम्मोड,सह कामगार आयुक्त (माथाडी) शिरीन लोखंडे इ. प्रमुख सहभाग होता.
    राज्यात माथाडी कायद्याचे काटेकोर अंमलबजावणी साठी राज्य माथाडी सल्लागार मंडळ व जिल्हा त्रिसदस्यीय माथाडी मंडळाची पुनर्रचना करणे, माथाडी मंडळावर पूर्णवेळ अध्यक्ष व सेक्रेटरीच्या नेमणूका करणे,माथाडी मंडळावर नोकर भरती करतांना माथाडी कामगारांच्या पाल्यांना प्राधान्याने नोकरीवर घेणे,माथाडी कामगारांचे मुळावर येणारे माथाडी अधिनियम ३४ रद्द करणे,धुळे – साक्री येथील खाजगी बाजार समित्या मध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी करणे,शासकीय धान्य गोदामात नोंदीत माथाडी कामगाराकडूनच द्वारपोंच सह जिल्ह्यातील सर्व माथाडी कामे करून घेणे,जे माथाडी कायद्याची अंमलबजावणी करणार नाहीत त्या व्यापारी, कंत्राटदार,कारखानदारांचे कामाचे परवाने रद्द करणे इ. मागण्या कृतीसमितीच्या नेत्यांनी कामगार मंत्र्यासमोरे मांडल्या.
    सर्व अडीअडचणी शांतपणे ऐकल्यावर मंत्रीमहोदयांनी, माथाडी कायदा शाबूत राहणार, मात्र कामगार संघटनांचे पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करूनच सकारात्मक बदल करण्यात येतील असे ठाम आश्वासन यावेळी दिले.
    डॉ.बाबा आढाव यांनी बैठकीत असे मांडले की,कांही मंडळी माथाडी कायद्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते थांबले पाहिजे.
    आम्ही सर्व जण आयुष्यभर शांततेच्या मार्गाने संघर्ष करणारी मंडळी आहोत.आमच्या माथाडी कामगारातील कोणी गुंडगिरी वा खंडणीखोरी करीत असेल तर त्याचेवर कठोर कारवाई करा पण माथाडी कायदा व सर्व माथाडी कामगारांना बदनाम करू नका.मागच्याच आठवड्यात जिनेव्हा येथे आंतरराष्ट्रीय कामगार ( ILO) संघटनेच्या संमेलनात माथाडी कायद्याची प्रशंसा करण्यात आली.कारण या कायद्यामुळे हमालासारख्या अंगमेहनती कष्टकऱ्यांना कामाची हमी तर मिळालीचे पण सर्व प्रकारच्या सामाजिक सुरक्षा ही मिळू लागल्या.त्यामुळे हमालांची मुले ही मुली डॉक्टर,इंजिनियर, वकील,प्राध्यापक,शिक्षक होवू लागले.कायदा नसता तर ते कदापी शक्य नव्हते.माथाडी कामगाराचे प्रश्न समजून घेण्यासाठी विभागवार बैठका घ्याव्यात असे बाबांनी सुचविल्यावर,मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद तर देतांना,प्रत्येक विभागात बैठक घेण्याचे मान्य केले.अशा बैठका महिना भरात घेण्यात याव्यात अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
    कामगार मंत्र्याबरोबर पहिलीच बैठक होत असल्याने,बैठकीचे सुरुवातीस ना.आकाश फुंडकर यांचे स्वागत डॉ.बाबा आढाव व नरेंद्र पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून केले.
error: Content is protected !!