February 9, 2026

कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय..!

  • पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स.१६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
    शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले.शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते,ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती.त्यांच्या आई जिजाबाई होत्या,ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचे होते.
    छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते.त्यांचे आजोबा मालोजी भोसले (१५५२-१५९७) अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना राजा ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे,चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला.
    वडील शहाजीराजे हे मुघलांचे बंडखोर सरदार होते.शहाजीराजांनी विजापूर सरकारच्या पाठिंब्याने मुघलांविरुद्ध केलेल्या मोहिमा साधारणपणे अयशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला आणि शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावे लागले.
    १६३६ मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहागिरी दिली शहाजीराजांनी पुढे तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला.लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या.तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.शिवाजी महाराजांना घेऊन जिजाऊ पुण्यात स्थायिक झाल्या.त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे दादोजी कोंडादेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली.१६४७ मध्ये कोंडदेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला.त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले.
    जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती.तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकात्मक सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुनःस्थापना करायला सुरुवात केली.शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात.हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाऊनी स्फूर्ती दिली.
    ११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात झालेल्या पुरंदरच्या तहात, शिवरायांनी २३ किल्ले सोडून देण्याचे कबूल केले,१२ स्वतःकडे ठेवले आणि मोगलांना ४,००,००० सोन्याचे हूण इतकी भरपाई दिली.शिवरायांनी मुघल साम्राज्याचा जामीनदार बनण्यास आणि मुलगा संभाजी यांना ५,००० घोडेस्वारांसह दख्खनमध्ये मुघलांशी लढण्यासाठी मनसबदार म्हणून पाठवण्यास सहमती दर्शविली.
    १६६६ मध्ये औरंगजेबाने शिवाजीराजांना त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा संभाजीसह आग्रा येथे बोलावले.मुघल साम्राज्याच्या वायव्य सरहद्दीला मजबूत करण्यासाठी औरंगजेबाने राजांना कंदाहार येथे पाठवण्याची योजना आखली,जो आता अफगाणिस्तानमध्ये आहे. तथापि,दरबारात १२ मे १६६६ रोजी,शिवरायांना तुलनेने कनिष्ठ सरदारांच्या बरोबर उभे केले गेले.यापैकी काहींना त्यांनी युद्धात आधीच पराभूत केले होते.शिवाजी महाराज या अपमानामुळे दरबारातून निघून गेले.यामुळे त्यांना तातडीने नजरकैदेत ठेवण्यात आले.
    शिवाजी महाराजांसाठी नजरकैदेत असलेली स्थिती धोक्याची होती,कारण शिवरायांना मारायचे की त्यांना कामावर ठेवायचे यावर औरंगजेबाच्या दरबारात वाद होता.जयसिंगने शिवाजीराजांना त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेचे आश्वासन दिले होते.म्हणून त्याने औरंगजेबाच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान,शिवाजीराजांनी स्वतःला मुक्त करण्याची योजना आखली. त्यांनी आपल्या बहुतेक लोकांना घरी परत पाठवले आणि रामसिंगला त्याने सम्राटाकडे स्वतःच्या आणि मुलाच्या सुरक्षिततेसाठी दिलेली हमी मागे घेण्यास सांगितली आणि स्वतःला मुघल सैन्याच्या स्वाधीन केले.तेव्हा शिवाजीराजांनी आजारी असल्याचे भासवले आणि ब्राह्मण आणि गरिबांना मिठाईने भरलेले मोठे पेटारे पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात.पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली.नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले.१७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराज स्वतः एका मोठ्या पेटाऱ्यात बसले आणि संभाजीला दुसऱ्या टोपलीत बसवून निसटले आणि त्यांनी आग्रा सोडले.
    कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता.शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला.बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.तोपर्यंत शिवाजी महाराज निसटून २४ तास झाले होते.
    आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले,तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या.ते स्वतःअतिशय लांबच्या आणि तिरकस वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.
    शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहिमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळविली होती.परंतु औपचारिक पदवी नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते मुघल जमीनदार किंवा विजापुरी जहागीरदाराचे पुत्र होते; ज्याला त्याच्या वास्तविक प्रदेशावर राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नसतो. कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते.तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते.राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे,विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्त्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.
    प्रस्तावित राज्याभिषेकाची तयारी १६७३ मध्ये सुरू झाली. तथापि,काही वादग्रस्त समस्यांमुळे राज्याभिषेकाला जवळपास एक वर्ष उशीर झाला. शिवाजीराजांच्या दरबारातील ब्राह्मणांमध्ये वाद निर्माण झाला: त्यांनी शिवरायांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण हा दर्जा हिंदू समाजातील क्षत्रिय (योद्धा) वर्णांसाठी राखीव होता. शिवराय हे शेती करणाऱ्या गावांच्या प्रमुखांच्या वंशातून आले होते आणि त्यानुसार ब्राह्मणांनी त्यांना शूद्र वर्णाचे म्हणून वर्गीकृत केले.त्यांनी नमूद केले की शिवरायांनी पवित्र धाग्याचा समारंभ कधीच केला नव्हता आणि जो धागा क्षत्रिय घालतात,तो कधीच घातला नव्हता.
    प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती.शिवाजी महाराजांचे भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते,तसेच ते ब्राह्मणही नव्हते.अर्थातच या शास्त्रांनुसार भोसले कूळ शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता.शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना क्षत्रिय जाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.
    शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची म्हणूनच त्यावेळी स्वराज्यास गरज होती.विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली.या पंडिताचे टोपणनाव गागाभट्ट असे होते आणि ते तत्कालीन ब्रह्मदेव व व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होते.त्यांनी सांगितले की त्यांना शिवाजीराजे हे सिसोदियांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारी वंशावली सापडली आहे आणि अशा प्रकारे खरोखरच ते एक क्षत्रिय आहेत,परंतु त्यांच्या पदासाठी योग्य समारंभांची गरज होती.
    ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचे (हिंदवी स्वराज्याचे) राजे म्हणून राज्याभिषेक झाला. हिंदू कॅलेंडरमध्ये तो दिवस १५९६ मध्ये ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या १३ व्या दिवशी होता.गागा भट्ट यांनी यमुना,सिंधू,गंगा,गोदावरी, नर्मदा,कृष्णा आणि कावेरी या सात पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेल्या सोन्याच्या पात्रातून शिवाजीराजांच्या डोक्यावर पाणी ओतले आणि वैदिक राज्याभिषेक मंत्रांचा उच्चार केला.शिवाजीराजांनी आई जिजाऊना नतमस्तक करून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. सोहळ्यासाठी रायगडावर जवळपास पन्नास हजार लोक जमले होते.शिवाजी महाराजांना शककर्ता (युगाचा संस्थापक) आणि छत्रपती (सार्वभौम) असे नाव देण्यात आले.त्यांनी हैंदव धर्मोद्धारक (हिंदू धर्माचे रक्षक) ही पदवी देखील घेतली.
    राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला,फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला.यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले.तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली.यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणला.या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला.तसेच त्याच्याकडून करणकौस्तुभ नामक ग्रंथही लिहवून घेतला.
    १८ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांचे निधन झाले.
    २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला.राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला.
    शिव जन्मोत्सवानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.
  • जय शिवराय

  • प्रा.अविनाश रंजना सुभाष घोडके
    भैरवनाथ अध्यापक विद्यालय, कळंब
error: Content is protected !!