मुंबई – शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिलासा मिळतो.मात्र निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण हे थेट लाभ हस्तांतरण (DBT) पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यात याव्यात. शासकीय वसतीगृह इमारतींची जिथे आवश्यक असेल तिथे तात्काळ दुरुस्ती करून घेण्यात यावी.वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनीनी सर्व सोई सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी.तसेच वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करावी.जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करावी.मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे. विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळासाठी एक एस.ओ.पी तयार करण्यात यावी,अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ,पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर,आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक,मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
More Stories
येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला
नवी मुंबईत महाराष्ट्र शासनाकडून आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी