June 22, 2025

अर्थतज्ञ डॉ.मनमोहनसिंग यांना विविध सामाजिक संघटनाकडून श्रद्धांजली

  • धाराशिव – भारत देशाचे माजी प्रधानमंत्री,जगद्विख्यात अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांना धाराशिव शहरातील विविध सामाजिक आणि परिवर्तनवादी नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध मान्यवरांकडून डॉ.मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.तसेच आलेल्या मान्यवरांनी डॉ.मनमोहनसिंग यांच्या महान कार्याबद्दल आपल्या वाणीतून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यात प्रामुख्याने सेवानिवृत्त विस्तार अधिकारी हरिभाऊ बनसोडे यांनी सविस्तर पद्धतीने डॉ.मनमोहन सिंग यांनी आर्थिक संकटाच्या काळामध्ये आणि भारत देशांमधील अर्थव्यवस्था प्रचंड खालावलेली असताना त्यांनी आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने देशाच्याअर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी केलेल प्रामाणिक आणि पवित्र कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
    तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त आणि मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर विजय गायकवाड यांनी देखील डॉ.मनमोहन सिंग यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना अभ्यासपूर्ण माहिती दिली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे धाराशिव जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष खलील सय्यद यांनी देखील आपल्या अभ्यासू वाणीतून डॉ.मनमोहनसिंग यांचा बालपणापासून ते प्रधानमंत्री पदापर्यंतचा जीवनपट मांडला. तसेच विठ्ठल नागरिक पतसंस्थेचे चेअरमन माननीय भैय्यासाहेब पाटील यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या जीवनावर सविस्तरपणे प्रकाश टाकला. सर्वोच्च न्यायालयाचे विधीज्ञ विश्वजीत शिंदे यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या कार्यावर उपस्थितांना अभ्यासपूर्ण माहिती दिली.सदरील कार्यक्रमाचे आयोजन सार्थक करियर अकॅडमीचे संचालक बाळकृष्ण उंबरे,समाबाई शंकर जगताप सामाजिक संस्था बोर्डा संचलित गुरुकुल कोचिंग क्लासेस,कास्ट्राईब कर्मचारी संघटना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शाखा,धाराशिव व विविध परिवर्तनवादी सामाजिक संघटनांनी केले होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल कोचिंग क्लासेसचे संचालक, इंजि.राहुल जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष अमर गुंड,सेवानिवृत्त कर्मचारी गौतम सोनवणे,आकाश उंबरे,भारत संचार निगम लिमिटेडचे लेखाधिकारी किरण रोकडे, सेवानिवृत्त कर्मचारी शिंदे इत्यादींनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन स्टेट बँक ऑफ इंडियाचे जनरल इन्शुरन्स मॅनेजर राजेंद्र सरवदे यांनी मानले.
error: Content is protected !!