धाराशिव (जिमाका) – कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक युवतींना व्हावा,या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना करण्यात येत आहे.जिल्ह्यातील १५ महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या या केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० सप्टेंबर २०२४ रोजी ऑनलाईन वर्च्यूअल पध्दतीने उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस कॉलेज,तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,मदर कांचन कॉलेज,सहयाद्री नर्संग कॉलेज,राजर्षी शाहू कॉलेज ऑफ सायन्स,तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुळजापूर,श्रीकृष्ण कॉलेज गुंजोटी,तात्याराव मोरे कॉलेज ऑफ फार्मसी उमरगा,भाउसाहेब बिराजदार वरिष्ठ महाविदयालय बलसुर,श्री स्वामी समर्थ आर्टस कॉलेज रूईभर,छत्रपती संभाजीराजे ज्युनिअर कॉलेज बेंबळी,शिक्षण महर्षी आर.जी शिंदे महाविदयालय परंडा,साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर कॉलेज रांजणी,हभप सोपानकाका केळे आयटीआय कॉलेज वाशी, विदयानिकेतन ज्युनिअर कॉलेज येरमाळा या १५ महाविद्यालयांची जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी यासंदर्भात सर्व उपायुक्त,सहाय्यक आयुक्त आणि प्राचार्यांना पत्र पाठविले आहे.आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० सप्टेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रामध्ये आवश्यक बाबींची पुर्तता करून महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र प्रशिक्षण प्रदाता यांच्यासोबत समन्वय साधून हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून,त्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा तसेच २० सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमाला संबंधित महाविद्यालयात जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील