August 9, 2025

आई राधा उदे उदे… येडाईच्या चैती पुनवेचा चुना वेचायला लोटला भाविकांचा जनसागर

  • येरमाळा (कुंदन कांबळे) – कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा राज्यातील मोठया प्रमाणात भरणारी यात्रा म्हणून यशस्वी यात्रा ठरली आहे. यंदा श्री येडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरली असुन देवीच्या यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम दि.२४ एप्रिल २०२४ रोजी वार बुधवारी रोजी मोठया उत्साहात पार पडला.
    या कार्यक्रमासाठी राज्यासह बाहेर राज्यातील पंधरा लाखांचा वर भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते.
    येडेश्वरी देवीची पालखी मंदिरावरुन चुन्याच्या रानात येताच लाखों भाविकांनी चुनखडीचे खडे वेचुन पालखीवर टाकत आई राधा उदे उदेचा एकच जय घोष केला.भाविकांच्या या गजराने चुन्याच्या रानाचा परिसर दुमदुमून गेला होता.
    बुधवारी सकाळी ८ वा. येडेश्वरी देवीची पालखी डोंगरावरील मंदिरातुन पाच दिवस चालणाऱ्या आमराई मंदिराकडे हालगी, जहांज, संबळाच्या गजरात वाजत गाजत निघाली. मुख्य चुन्याच्या रानात पालखी १० वा. येताच भाविकांनी आई राधा उदे उदे, येडूसरीचा उदे उदेच्या जयघोष करताच चुन्याच्या रानाचा परिसर भाविकांच्या गजराने दणाणून निघाला.
    श्री येडेश्वरी देवीच्या मंदिराला यात्रे नंतर पालखी डोंगरावरील मुख्य मंदिरात परत गेल्या नंतर चुन्याने रंगावण्याची पूर्वापार परंपरा चालत आली आहे. त्यामुळे चुना वेचण्याचा कार्यक्रम यात्रेचा मुख्य कार्यक्रम मानला जातो. चुना वेचण्यासाठी यात्रेला येण्याची परंपरा भाविकांच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेली प्रथा असल्याने मजूर,शेतमजूर, बिगारी,चाकरमाने कर्मचारी, लहान मोठे व्यावसायिक, व्यापारी,भाविक राज्यभरातून न चुकता दरवर्षी चुना वेचण्यासाठी दाखल होतात.काळानुरुप या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या प्रतिवर्षी वाढतच गेल्याने आता ती लाखोंच्या संख्येवर पोहचली आणि श्री येडेश्वरी देवीची यात्रेला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा असा मान प्रशासन स्तरावर आल्याने यात्रा पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आली आहे.
    श्री येडेश्वरी देवीच्या चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला वेगळे महत्व असुन यात्रेत या दिवशी येणाऱ्या पालखीवर चुन्याच्या रानात पालखी येताच चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकण्यासाठी लाखों भाविकांची झुंबड उडते.त्यामुळे भाविकांची आपले चुन्याचे खडे पालखीवर पडावे यासाठी स्पर्धाच लागली आहे की काय असे चित्र दिसत होते.
    यात्रेत भाविकांनी वेचलेला चुना गोवऱ्याची भट्टी लावुन भाजला जातो. यात्रेनंतर पालखी मुख्य मंदिरात पोहचल्याच्या दुसऱ्या दिवशी देवीचे मंदिर चुन्याने रंगवले जाते त्यामुळे यात्रेत चुना वेचण्याचा प्रथा रुढ झाल्याचे जाणकारांचे मत आहे.
    ही परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आली असुन चुन्याच्या रानात पालखी येताच चुनखडीचे कडे आपोआप रानात येतात असे लोक सांगतात.
    चुन्याचे खडे आपोआप वर येतात यावर देवी येडेश्वरी जागृत देवी असण्याचा भाविकांना विश्वास येतो त्यामुळेच भाविकांची तोबा गर्दी होते. यात्रेचे स्वरुपही यामुळेच वाढले आहे. चुन्याच्या रानातून देवीची पालखी ११ वा. आमराई मंदिरातील पालखी मंदिरात पोचली येथेही पालखी दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती.
    श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेसाठी पोलीस प्रशासनाने विविध उपाय योजना आखून तगडा बंदोबस्त केला होता. पालखी मुख्यमंदिरातुन पोलिस प्रशासनाच्या कमांडो, दंगल नियंत्रण पथक, देवस्थान सयंसेवक,स्थानिक ग्रामसुरक्षा दलाच्या संरक्षण कड्यात निघाल्याने सुरक्षित पणे पालखी मिरवत आली.
    यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी, देवस्थानचे पुजारी, मानकरी, पालखी सोबत होते. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पालखीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. त्यांनी देवीचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याला उपस्थिती लावली. शिवाय माजी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील,
    आमदार कैलास पाटील, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी ठीक ठिकाणी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली होती. भारतीय स्टेट बँकेच्या वतीने थंड आरओ पाण्याच्या पानपोईची व्यवस्था करण्यात आली होती.
    देवीच्या पालखीचे आज चैत्र पोर्णिमा यात्रेनिमित्त आमराई मंदिराकडे आगमन होणार असल्याने स्थानिक भविकात मोठा उत्साह होता. पालखीच्या स्वागतासाठी गावातील महिला भाविकांनी बाजारचौक, वाणीगल्ली, रोकडेश्वर मारुती मंदिर चौक, छत्रपती मार्केट, संभाजी नगर रस्त्यावर मोठं मोठया रांगोळी, फुलांच्या रांगोळीची सजावट केली होती.
    सोमवारी पहिल्या पोर्णिमेपासूनच भाविक लाखोंच्या संख्येने येरमाळ्यात दाखल होत होते. भाविकांची विक्रमी संख्या दाखल झाल्याने प्रत्येकाच्या हाती असलेले प्रत्येक कंपनीचे स्मार्ट फोन कव्हरेज मिळतं नसल्याने शोभेची वस्तु ठरले.
    यंदाची यात्रा म्हणजे भाविकांच्या जमलेल्या अलोट गर्दीने आज पर्यंतचे विक्रम मोडीत काढणारी यात्रा ठरली चुना वेचाण्याच्या कार्यक्रमानंतर परत फिरलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर ते बीड पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
error: Content is protected !!