कळंब – ग्रामीण संस्कृतीचे आणि कृषी परंपरेचे प्रतीक असलेली वेळ अमावस्या यंदा शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांनी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरी केली.या दिवशी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीतील अवजारे,बैलजोडी,ट्रॅक्टर तसेच शेतीशी संबंधित साहित्याची विधीपूर्वक पूजा करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पहाटेपासूनच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतात व घराच्या अंगणात पूजा-अर्चा केली. बैलजोडींची आंघोळ घालून त्यांना सजविण्यात आले,तर शेतीची अवजारे स्वच्छ करून त्यांना फुले, हार व हळद-कुंकू अर्पण करण्यात आले. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने नैवेद्य दाखवून ग्रामदैवताचीही पूजा करण्यात आली. वेळ अमावस्येच्या निमित्ताने ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.शेतकरी कुटुंबीयांसह नागरिकांनी एकत्र येत परंपरेचा वारसा जपला.यावेळी शेती,निसर्ग व पशुधन यांच्या महत्त्वावर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात पशुधन व शेती साधनांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित झाले. या सणाच्या माध्यमातून निसर्गाशी नाते अधिक दृढ होते,तसेच पुढील कृषी हंगाम सुखकर जावा,भरघोस पीक येवो,अशी प्रार्थना करण्यात आली. वेळ अमावस्या हा केवळ धार्मिक सण नसून शेती संस्कृती जपणारा महत्त्वाचा दिवस असल्याची भावना यावेळी अनेक नागरिकांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांसह सर्व समाज घटकांनी सहभागी होत साजरी केलेली वेळ अमावस्या ग्रामीण परंपरा, एकोप्याचे दर्शन घडविणारी ठरली.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड