धाराशिव – जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. हिंगणगाव खुर्द येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तत्काळ गावाला भेट देऊन मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत जोरदार पाऊस पडत असून अनेक नद्या,ओढे व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हिंगणगाव खुर्द येथील रहिवासी दुर्दैवाने पुराच्या प्रवाहात सापडले आणि त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात जाऊन कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांनी प्रशासन या कठीण काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत शासन नियमांनुसार सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील पूरस्थितीचा आढावा घेतला.संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य व बचावकार्य गतीमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान,प्रशासनामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,खबरदारी घ्यावी, सुरक्षित स्थळी राहावे तसेच नदी-नाल्यांच्या प्रवाहापासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य