हंगामापूर्वी अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना; आमदार कैलास पाटील यांची कडक भूमिका
धाराशिव – जिल्ह्यात यंदा पाऊसमान चांगले झाले असून शेतकऱ्यांना विजेअभावी अडचणी येऊ नयेत,यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातील विजेच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमदार कैलास पाटील यांच्या मागणीनुसार मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीत आरडीएसएस व एडीबी अंतर्गत सुरू असलेल्या वीज प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.जिल्ह्यात २४ नवीन उपकेंद्र मंजूर असून ४० उपकेंद्रांमध्ये क्षमतावाढ करण्याची कामे लवकर सुरु करावीत,असे आदेश राज्यमंत्री बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीनंतर आमदार कैलास पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांना दिवसा पुरेशी वीज मिळाली पाहिजे,यासाठी शासनाने योजना मंजूर केल्या आहेत.मात्र कंत्राटदारांकडून कामात दिरंगाई केली जात आहे.अशा कंत्राटदारांविरुद्ध कठोर कारवाई करून कामे कालमर्यादेत पूर्ण केली पाहिजेत.शेतकऱ्यांच्या हितासाठी हीच खरी वेळ आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत फीडरवर एसडीटी बसविणे,ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर बदलणे,एनएससी योजनेतून वस्तीवर वीजपुरवठा करणे, तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी योजनेतील मंजूर दहा उपकेंद्रांची कामे प्राधान्याने सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार,कार्यकारी संचालक (प्रकल्प)धनंजय औंढेकर,मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य