June 18, 2025

हमाल कष्टकऱ्यांच्या बाईक रॅली ने केले शहरात जनजागरण

  • संभाजीनगर – जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि.१ मे २०२५ रोजी हमाल कष्टकऱ्यांनी शहरातून बाईक रॅलीचे आयोजन केले होते.
    या रॅलीत कामगारांचे ज्वलंत प्रश्नाबरोबरच,सध्या शहरात गाजत असलेल्या व लोकांच्या जिव्हाळ्याचे असलेल्या पाण्याचे प्रश्नावर ही जनजागरण केले.
    हमाल कष्टकऱ्यांची बाईक रॅली, मराठवाडा लेबर युनियन चे अध्यक्ष डॉ.सुधीर देशमुख व सरचिटणीस ऍड.सुभाष सावंगीकर यांचे नेतृत्वाखाली क्रांती चौकातून निघून, सिडको बस स्टँड,डॉ.आंबेडकर नगर चौक,जाधववाडी चौक,टी.व्हि. सेंटर,कलेक्टर ऑफिस, आमखास मैदान,भडकल गेट, मिल कॉर्नर मार्गे नारळीबागेतील संघटनेचे कार्यालय असलेल्या संविधान भवन येथे पोहोचल्यावर तेथे कामगार – कष्टकरी व शेतकऱ्यांचे प्रश्नावर झालेल्या परिसंवादात अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
    डॉ.सुधीर देशमुख यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात ,शेतकरी प्रश्नावरील अभ्यासक साथी dnyaneshvar वाघचौरे, आयटक चे ऍड.अभय टाकसाळ, तरुण पत्रकार शेख अन्वर,मराठवाडा लेबर युनियन चे सरचिटणीस ऍड. सुभाष सावंगीकर व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी आपले विचार मांडले…..
    कामगार – कष्टकऱ्यांनी संघर्ष करून, गेले १०० वर्षांत जे मिळविले,ते गेले १०- १२ वर्षापासून सत्ताधाऱ्यांकडून काढून घेण्याचा पद्धतशीर प्रयत्न होतो आहे.४४ कामगार कायद्यांचा खात्मा करून, जे ४ कायदे तयार केले,त्यास कामगार कायद्या ऐवजी मालक धार्जिणे कामगार कायदे म्हणणे जास्त संयुक्तिक असल्याची मांडणी ऍड. अभय टाकसाळ यांनी केली.शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे, शेती मालास हमी भावाचे कायदेशीर संरक्षण दिले जावे या मागणी साठी शेतकरी आज संघर्ष करतो आहे, पण त्या कडे सरकारचे संपूर्ण दुर्लक्ष असल्याने, आज शेतकरी कधी नव्हे इतका संकटात सापडला असल्याचे प्रतिपादन साथी दिनेशवाघचौरे यांनी केले.सर्व जातीधर्मातील सामान्य लोक त्यांच्या जगण्याचे प्रश्नावर संघर्ष करीत असून,त्यांना आपसात लढविण्याचे कारस्थान शिजविले जात आहे,त्यासाठी फक्त चर्चा करण्या ऐवजी रस्त्यावर येवून लढण्याची गरज असल्याचे शेख अन्वर यांनी सांगितले.वर्षानुवर्ष संघर्ष करून मिळविलेले हक्क – कायदे,भांडवलदारांच्या दबावाला बळी पडून सरकार ते बदलू पहात आहे.कष्टकरी – शेतकऱ्यांची एकजूट होणार नाही, यासाठी जाती – धर्माचे नावाने संघर्ष पेटविले जात आहेत.या पासून कष्टकऱ्यांनी सावध रहायला हवे,कष्टकरी – शेतकऱ्यांची भक्कम एकजूट तेंव्हाच शक्य आहे,जेंव्हा ते एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतील आणि त्यासाठी हमाल कष्टकऱ्यांनी पुढाकार घेऊन जनजागरण करण्याचे आवाहन साथी सुभाष लोमटे यांनी यावेळी केली.
    अध्यक्षीय समारोप करतांना डॉ. सुधीर देशमुख यांनी असे आवाहन केले की, येथून पुढचा काळ हा कष्टकरी – शेतकऱ्यांनी हातात हात घालून वाटचाल करण्याचा आहे. मरगळ झटकून एकजुटीचे दिशेने वाटचाल करण्याचा आहे….. तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होईल, त्याला उत्तर म्हणून वस्ती, मोहोला, वॉर्ड, गाव पातळीवर सर्वसमावेशक कमिटी करावी असे आवाहन केले….
    परिसंवादाचे प्रास्ताविक व सूत्रसंचल ॲड. सुभाष सावंगीकर यांनी केले तर आभार साथी देविदास कीर्तिशाही यांनी मानले.
    या कार्यक्रमास श्रमिक मुक्ती दलाचे सुबेदार मेजर सुखदेव बन, आप चे प्रा. वैजनाथ राठोड, स्वराज अभियान चे शेख खुर्रम, मा.अर्चना मेढेवार, तसेच मराठवाडा लेबर युनियन चे साथी सर्जेराव जाधव, साथी शिवाजी राऊत, साथी जगन भोजने, साथी आबासाहेब तुपे, इ. ची प्रमुख उपस्थिती होती.
error: Content is protected !!