आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार लाभ शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या घटकातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण प्राप्त करणे हे अनेकदा मोठे आव्हान असते.या पार्श्वभूमीवर,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे.आतापर्यंत केवळ जिल्हास्तरावर उपलब्ध असलेली ही योजना आता तालुकास्तरावरही लागू करण्यात येणार आहे.या शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यापैकी इयत्ता ११ वी व १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी विविध स्तरावरील महाविद्यालयात / शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे,म्हणून भोजन,निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत : उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी ” भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ” सुरु केली आहे.या योजनेंतर्गत शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या नवबौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. याअंतर्गत महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि निवासासाठी आवश्यक असणारा खर्च भागवण्यासाठी मदत केली जाते. शैक्षणिक संधींचा विस्तार–गरीब आणि मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देणे.आर्थिक मदत उपलब्ध करणे निवास,भोजन,शिक्षण साहित्य यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे. ड्रॉपआउट कमी करणे – आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याचे प्रमाण कमी करणे.स्वावलंबन वाढवणे – विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून रोजगारक्षम बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ आतापर्यंत जिल्हास्तरावरच उपलब्ध होता.त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा पाहिजे तसा फायदा मिळत नव्हता. मात्र,तालुकास्तरावर योजनेंचा विस्तार केल्यामुळे अनेक सकारात्मक परिणाम होणार आहेत. अनेक हुशार विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या शहरांमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत. तालुकास्तरावर योजना लागू झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या तालुक्यातच शासकीय मदतीचा लाभ घेता येईल. शहरात राहण्याचा खर्च मोठा असतो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते.आता तालुक्यातच स्वाधार योजनेचा लाभ मिळाल्याने विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षण पूर्ण करू शकतील.
गावखेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास किंवा स्थलांतर करावे लागते.परंतु आता स्वाधार योजनेचा तालुकास्तरापर्यंत विस्तार झाल्यामुळे ते आता स्वतःच्या परिसरात राहून उच्च शिक्षण घेऊ शकतील,ज्यामुळे साक्षरतेचे प्रमाणही वाढण्यास मदत होणार आहे.
शिक्षणामुळे नोकरीच्या संधी वाढतात.त्यामुळे समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल.शिक्षण घेतलेल्या तरुणांनी स्वयंरोजगार किंवा चांगल्या नोकऱ्या मिळवल्यास संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.
*स्वाधार योजनेअंतर्गत मिळणारे फायदे*
तालुकास्तरावर लागू झाल्यानंतर योजनेचे फायदे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील.या योजनेंतर्गत खालील प्रकारची आर्थिक मदत दिली जाते निवास आणि भोजन खर्च – ज्यांना वसतिगृह मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांना दरमहा ठराविक आर्थिक मदत.शिक्षण साहित्य आणि फी – पुस्तके,स्टेशनरी, महाविद्यालयीन फी यासाठी आर्थिक सहाय्य.व्यावसायिक शिक्षणासाठी मदत – अभियांत्रिकी, वैद्यकीय,फार्मसी,लॉ,एमबीए यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना लागणाऱ्या खर्चासाठी विशेष अनुदान.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा तालुकास्तरावर विस्तार हा शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीसारखा आहे.यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठी मदत मिळेल, शिक्षणसंख्येत वाढ होईल आणि आर्थिक प्रगतीलाही चालना मिळेल.महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असून, योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्यामुळे भविष्यात अनेक विद्यार्थ्यांचे जीवन सकारात्मकपणे बदलू शकते.
*योजनेंतर्गत लाखोंचा निधी वितरित*
जिल्ह्यातील स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य दिले जात आहे.सन २०१८-१९ मध्ये ५७८ अर्जांपैकी ४२४ पात्र ठरले होते आणि २३ लक्ष ५८ लाख रुपये वाटप झाले.त्यानंतर, २०१९-२० मध्ये ८५८ अर्जांपैकी ६२७ लाभार्थ्यांना ८४ लक्ष २९ लाख रुपये वितरित झाले. २०२०-२१ मध्ये ८४९ पात्र अर्जदारांना १ कोटी ९८ लाख रुपये मिळाले.२०२१-२२ मध्ये १२७१ पैकी १०७५ विद्यार्थ्यांना १ कोटी २६ लाख रुपयांचा लाभ मिळाला. २०२२-२३ मध्ये १०५६ अर्जांपैकी ८९२ पात्र ठरले,आणि ३ कोटी ४३ लाख ५३ हजार रुपये निधी वाटप झाला. २०२३-२४ मध्ये अर्जांची संख्या वाढून १३०३ झाली असून, १०५६ विद्यार्थ्यांना १० कोटी १५ लाख ७४ हजार रुपये मिळाले. त्यामुळे या योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यास मदत झाली आहे.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन