June 23, 2025

संपादकीय कोल्हापुरात संविधांन जागर..!

  • ‘ अवघाचि संसार सुखाचा करीन’ अशी प्रतिज्ञा संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली.संसार अर्थात संपूर्ण जग,हे जग सुखाने भरून टाकण्याचे स्वप्न संत महात्म्यानी पाहिले होते.हेच स्वप्न सत्यात उतरण्यासाठी या देशातील आणि विशेषता महाराष्ट्रातील संत- महात्मे आणि महापुरुषांनी सतत मानवी मूल्यांचा जागर केला आहे. त्याचेच प्रतिबिंब आपण संविधानातून पाहत आहोत.या देशातील प्रत्येक माणूस सुखी आणि आनंदी रहावा अशी रचना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून केली आहे.
    आम्ही स्वतःला भारतीय म्हणवतो,पण एवढीच आमची ओळख नाही.आपला समाज वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या संस्कृती,विविध पोशाख, वेगवेगळे धर्म आणि राहणीमान असलेल्या चार हजाराहुन अधिक समुदायांनी बनलेला आहे. आपण भारतीय आहोत तर आपण हिंदू,मुस्लिम,आदिवासी, शीख,ख्रिश्चन,पारशी किंवा बौद्ध आहोत.
    कन्नड,तामीळ,ओडिया,मराठी किंवा नागा पण आहोत. लोकशाही अर्थात आपल्यापैकी कोणीही दुसऱ्यापेक्षा लहान किंवा मोठा नाही.प्रत्येकाला सारखाच मान आहे आणि भारतात सर्वांचा वाटा ही समान आहे.म्हणूनच इतकी विविधता असूनही संविधानामुळेच भारत एक संघ आहे.
    जात,धर्म,लिंग,प्रांत,आर्थिक परिस्थितीमुळे कोणासोबतही भेदभाव होणार नाही.असा कायदा संविधानात आहे. महिला,शोषित जाती आणि समाजातील इतर घटकांना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवणारा सामाजिक भेदभाव आपल्या देशात शतकानुशतके चालत आलेला होता तो भेदभाव नष्ट करून सर्वांना समान न्याय देण्याचा मार्ग संविधानाने दिला आहे.आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आणि शेवटच्या माणसालाही त्याच्या क्षमता विकसित करण्याची संधी देण्यासाठी आणि विकास करण्यासाठी सरकारला संविधान निर्देशित करते.देशाचे राज्यकर्ते निवडून देण्याचा अधिकार गरीब- श्रीमंत,स्त्री- पुरुष यांना एकच मताचा अधिकार याच संविधानाने दिला आहे.प्रत्येक भारतीयाला आपल्या आवडी-निवडीनुसार जगण्याचे, विचार करण्याचे,प्रार्थना करण्याचे,बोलण्याचे,खाण्याचे, कपडे घालण्याचे आणि काम करण्याचे स्वातंत्र्य संविधानामुळेच मिळते. म्हणूनच संविधान जनजागृती करून समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधूता आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी सामाजिक संघटना एकत्र करून लोकसंघर्ष मोर्चाच्या रणरागिनी प्रतिभाताई शिंदे यांनी समतेचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमीत कोल्हापुर येथील हॉटेल सयाजीच्या भव्य आणि दिव्य अशा हॉलमध्ये दिनांक ५ ऑक्टोबर रोजी विविध स्तरात काम करणाऱ्या सामाजिक संस्था आणि संघटनांच्या दोन हजार कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संविधान सन्मान संमेलन यशस्वी केले.
    आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सौजन्यातून सुभासिनी यादव,डॉ.अनिल जय हिंद, अशोक भारती,आ.राजेंद्र पाल गौतम आणि प्रतिभा शिंदे यांनी केलेल्या अथक परिश्रमातून शानदार झालेल्या या संमेलनात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांनी संविधानचा जागर घातला.
    संविधान प्रेमी सोबतच छत्रपती शाहू महाराजांचे वंशज खा.शाहू महाराज,पृथ्वीराज चव्हाण,नाना पटोले,भाई जगताप,बाळासाहेब थोरात,सुशील कुमार शिंदे, खा.प्रणीती शिंदे आदी सोबत मी आणि माझे सहकारी बंडू आबा ताटे,नवनाथ भंडारे,भाई उमाजी देशमुख आदी या संविधान सन्मान संमेलनात सहभागी झालो होतोत.
    राहण्याची,चहा-नाष्टा- जेवणाची,संमेलनातील बैठक व्यवस्था,विद्युत रोषणाई- साऊंड सिस्टिम,भव्य दिव्य अशा महापुरुषांच्या डेकोरेटिव्ह प्रतिमा, संत महात्म्याच्या अभंगासह असलेल्या प्रतिमा अशा भव्य-दिव्य भूतो ना भविष्य अशी ही परिषद अविस्मरणीय राहील.
  • जय शिवराय ..! जय भीमराय..!! जय संविधान …!!!
error: Content is protected !!