मुंबई – गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यवाही केली होती. अर्थसहाय्य योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात दि.३० सप्टेंबर २०२४ रोजी मंत्रीमंडळ बैठकीतून करण्यात आली. याद्वारे एका क्लिकवर सुमारे 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत 2398 कोटी 93 लक्ष रुपये रक्कम वर्ग करण्यात आली. 2023 च्या खरीप हंगामात एकूण 96 लाख 787 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण 4194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी 1548 कोटी 34 लक्ष रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2646 कोटी 34 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांचे संमती पत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आली. आज जवळपास 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला आहे. आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसं तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
More Stories
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“स्थगिती नसताना शेतकऱ्यांचे पैसे का अडवले?” – २०२० च्या पीकविम्यावर आमदार कैलास पाटील विधानसभेत आक्रमक
१७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा;शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी – कृषी विभागाचे आवाहन