June 22, 2025

लेखनातील सत्य आणखी सत्व!

  • देशाची उन्नती मधे प्रसार माध्यमांचा हातभार असतो.तसा देशोन्नती पेपरचा लागला पाहिजे.तो प्रत्यक्ष कृतीतून नसला तरीही विचार, भुमिका,धोरण यांचा प्रसार करणे यात महत्त्वाची भुमिका असते.समाजातील घटित घटनांची माहिती संकलित करून वाचनिय स्वरूपात उपलब्ध केली जाते.तसेच शासन प्रशासन मधील अघटीत घटनांची सुद्धा माहिती मिर्ची मसाला लावून प्रसारित केली जाते.आमदार खासदार मंत्री ने न केलेल्या कामांची सुद्धा माहिती जनतेपुढे मांडली जाते.त्यामुळे कामासाठी आलेला किंवा आणलेला निधी फस्त केला तरी गुणगान केले जाते.त्यामुळे जळगाव मधील सराईत गुन्हेगार नगरसेवक बनले.आमदार बनले.मंत्री बनले.याची काळी बाजू मुद्दाम झाकली जाते.त्यासाठी स्वतंत्र मक्ता घेतला जातो.नाऱ्याचा नारायण,गुल्याचा गुलाबराव,दानवाचा देव बनवण्याचा हा कारखाना आहे.दाऊदचा दयावान बनवला असता पण दाऊद ने तसा करार माध्यमांशी केलाच नाही.ही चूक ठरली.
    अर्थात येथे फक्त पितळी भांड्याला कल्हई केली जाते. कल्हई काढून पितळ उघडे करणाऱ्या कारखान्यात पितळावर कल्हई करण्याचे उद्योग आता वाढल्यामुळे राजकीय चोरांना बोनाफाईड देणे वाढलेले आहे.त्याचा परिणाम आम्ही जनता भोगतोच. पण पेपर माध्यमे सुद्धा लयाला जात आहेत.काल पर्यंत ज्यांचे फोटो पेपर मधे झळकले होते तो आता जेलमध्ये दिसतो .तेंव्हा पेपर वरील विश्वास उडतो.म्हणून खप कमी झाला आहे.विपरीत लेखनामुळे ही आपत्ती उद्भवलेली आहे.
    निवडणूक काळात तर उमेदवारांना भेटून दहा दिवस त्यांचे भजन कीर्तन प्रवचन करण्याचा ठेका घेतला जातो.रावणाचा राम भासवणे यासाठी स्वतंत्र पॅकेज आणि रामाला राम न सांगण्याचे वेगळे पॅकेज घेतले जाते.ज्याने गरीबाने , इमानदार माणसाने असे पॅकेज दिले नाही तर तो जिवंत नाहीच असे समजून बातमी छापली जाते.यामुळेच राजकारणात गुन्हेगार शिरलेत.अनेक गुन्हेगारांना जेलमधून विधानसभेत पोहचवले गेले.ते दुष्ट कर्म आहे.याची जाणिव उरलेली नाही.पैसा आणि प्रसिद्धी हेच समीकरण वापरल्यामुळे पैसा मिळतो पण विश्वासाहर्ता गमावल्याने पेपर बंद होण्याची आफत ओढवून घेतली.
    वाल्मिक ऋषींनी रामायण लिहीतांना असा विचार केला असेल का,माझे पुस्तक कोण विकत घेईल?व्यास ऋषींनी महाभारत लिहीतांना असा विचार केला असेल का,माझे पुस्तक कोण घेईल?तरीही त्यांचे लेखन आजही शिरसावंद्य आहे.का?का?याचा विचार माध्यमांनी केला पाहिजे.लेखनात सत्य आणि सत्व असल्यामुळे ते अनादी काळापासून टिकून राहिले.कोणालाही नाकारता आले नाही.पुसता आले नाही.मिटवता आले नाही.त्यांनी असा राम वर्णन केला जो अनेकदा मंदिर पाडूनही राम बेघर झाला नाही.कारण रामाने मानवाच्या हृदयात घर केलेले आहे.जोपर्यंत मानव आहे तो पर्यंत रामाला दगडाच्या मंदिराची गरज पडणार नाही.त्यांनी असा कृष्ण वर्णन केला कि तो मानवाच्या नखशिखांत संचारलेला आहे.मृत्यू नंतरही सुटत नाही.शस्राने मरत नाही.अग्नीने जळत नाही.
    माध्यमांनी असे समजू नये कि,सत्य आणि सत्व लिहीले तर पेपर कोणी वाचणार नाही.असे मुळीच नाही.जो पर्यंत पृथ्वीतलावर मानव आहे तो पर्यंत सत्य आणि सत्व कधीही झाकले जाणार नाही.कोणी लिहीले,न लिहीले त्यावर सत्य आणि सत्वाचे अस्तित्व अवलंबून राहत नाही .ते विश्वाच्या निर्मितीचे कारण आहे.तोच तर मानवाचा कणा आहे.मणका आहे.
    असा कणा आणि मणका मोडला तर पेपर जिवंत राहाणार नाही.हेच आजचे ,कालचे,उद्याचे सत्य आहे.हेच लेखनातील , बोलण्यातील सत्व आहे.
  • — शिवराम पाटील
    ९२७०९६३१२२
    महाराष्ट्र जागृत जनमंच
    जळगाव
error: Content is protected !!