June 25, 2025

शेतीवर आधारित उद्योग उभारण्यासाठी प्रयत्नांची गरज – खा.राजेनिंबाळकर

  • धाराशिव – कोणत्याही विकासाच्या योजना या आपल्या भागात राबविल्या जाऊ शकतात का, याचा विचार करून आश्वासने द्यावी लागतात. अशक्य योजनांची स्वप्ने दाखवून नागरिकांची दिशाभूल करणे अपेक्षित नाही. सगळ्यात महत्वाचे शेतीला शाश्वत पाणी, २४ तास वीज देण्यासाठी प्रयत्न करण्याची तसेच शेतीवर आधारित उद्योग उभारण्याची गरज आहे, अशी भूमिका धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मांडली.
    धाराशिव जिल्हा पत्रकार संघातर्फे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित वातार्लाप कार्यक्रमात शनिवारी (दि.१५) ते बोलत होते. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांनी खा. ओमराजे यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. पत्रकार महेश पोतदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर पाच वर्षात काय करणार आहेत. या विषयावर पत्रकार बांधवांसोबत ओमराजे यांनी वातार्लाप केला. धाराशिव जिल्ह्यातील पाणी, रस्ते, रेल्वे, उद्योग आणि शेती प्रश्नावर ओमराजे यांनी खासदार म्हणून करावयाच्या कामांचे व्हिजन मांडले. धाराशिव जिल्हा हा आकांक्षीत जिल्हा आहे, ही आपल्यासाठी गौरवाची गोष्ट नाही. जोपर्यंत जिल्ह्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढणार नाही तोपर्यंत हा जिल्हा आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीतून बाहेर येणार नाही. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे ओमराजे म्हणाले. जिल्ह्यात पाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे आपल्या भागात मोठे उद्योग किंवा कंपन्या येण्यास अडचणी येतात. त्यामुळे शेतीवर आधारित उद्योग सुरु करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे ओमराजे यांनी सांगितले. जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू झाले, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम सुरू झाले. या कामासाठी खासदार म्हणून सातत्याने पाठपुरावा केला होता, अजूनही हा रेल्वे मार्ग तसेच सुरत-चैन्नई महामार्ग तातडीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र हे करताना कोणत्याही शेतकºयांवर मावेजा संदर्भात अन्याय होणार नाही, याचीही काळजी घेणार आहे. आपला जिल्हा शेतीवर आधारित असल्याने जिल्ह्यात शेतीला शाश्वत पाणी, चोवीस तास वीज पुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यावेळी ओमराजे यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा पट उलगडला. २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळी फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे शासकीय कामांची प्रक्रिया नेमकी कशी असते याबद्दल माहिती नव्हती. पुढे अनुभवाने शिकत गेलो. सुरुवातीच्या काळात शासकीय अधिकाऱ्यांना कामासाठी आक्रमकपणे बोलत होतो, नंतर माझ्या लक्षात आले की त्याचा इमेजवर चुकीचा परिणाम होत आहे. त्यामुळे पुढच्या काळात मी आक्रमकता कमी केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न, शेतकरी आत्महत्येचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न आजही गंभीर आहे. या प्रश्नावर प्राधान्याने काम करावे लागेल. पत्रकारांनी हक्काने जिल्ह्यातील समस्या आणि प्रश्न मला सांगावेत त्याचा नक्की पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार हे प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून काम करत असतात, त्यात धाराशिवसारख्या ग्रामीण भागातील पत्रकारांचा अभ्यास चांगला आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रश्न मांडण्याची धमक त्यांच्यात आहे. पत्रकारांच्या दृष्टीला जे दिसते ते इतर कुणाला दिसत नाही. त्यामुळे पत्रकार बांधवांनी वेळोवेळी सूचना कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    यावेळी पत्रकार संघाचे सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर, राजाभाऊ वैद्य, संतोष हंबिरे, महेश पोतदार, बालाजी सुरवसे, बालाजी निरफळ, मच्छिंद्र कदम, आरिफ शेख, कालिदास म्हेत्रे, अझर शेख, रहीम शेख, राहुल कोरे, अमजद सय्यद, इस्माईल सय्यद, सलीम पठाण, राकेश कुलकर्णी, सुधीर पवार, सुभाष कदम, सज्जन यादव, कलीम मुसा, आकाश नरोटे, बाळासाहेब अणदुरकर, सयाजी शेळके, अनंत अडसुळ, रवी केसकर, अमोल गाडे, वसंत वाघमारे, बाळासाहेब मुंदडा, राजेंद्रकुमार जाधव, पांडुरंग मते, शिवराज गव्हाणे, कैलास चौधरी, विकास सुर्डी, मनोज मोरे, शीतल मंगल, विनोद कोकाटे, विनोद बाकले, दौलत निपाणीकर आदी पत्रकार बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.
error: Content is protected !!