धाराशिव (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या सुचना आणि जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.मैनक घोष यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर ‘जप्त रोकड निर्णय समिती’ गठित करण्यात आली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण देशासह जिल्ह्यातही आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा काम करीत आहे.कुठेही आदर्श आचार संहितेचा जिल्ह्यात भंग होणार नाही याकरीता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी निवडणूकीदरम्यान जिल्ह्यात भरारी पथके (एफएसटी), स्थिर संनिरीक्षण चमू (एसएसटी) आणि पोलिस विभागाकडून झालेल्या कार्यवाहीतून रोकड/ मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्यास ही रक्कम मुक्त करणेसाठी मानक कार्यकारी प्रक्रियेबाबत (स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) निर्देशित केलेले आहे. जप्त करण्यात आलेली रोकड व मौल्यवान वस्तुंच्या संदर्भात पुढील निर्णयाकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या अध्यक्षतेखाली एक अपिलीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे सदस्य सचिव म्हणुन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांची, उपाध्यक्ष म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे,सदस्य म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी सचिन सालकर, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी चिन्मय दास, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे व पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस निरीक्षक अमोद भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या कालावधीत ज्या नागरीकांची रोकड/मौल्यवान वस्तू जप्त केले जाईल ते नागरिक या समितीकडे वैध कागदपत्रांसह अपिल करु शकतील अशी माहिती या समितीकडुन देण्यात आली आहे. दरम्यान लोकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडु नये.असे आवाहन या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी केले आहे.
More Stories
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ
ग्रामोदय समितीच्या संचालकपदी उद्योजक गुंडू पवार यांची एकमताने निवड
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात अभिवादन