कळंब (अविनाश घोडके ) – भाजपाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद घ्यायचे ठरले होते. परंतु गृहमंत्री अमित शहांनी शब्द फिरविला. शिवसेना ही माझीच असून त्यांनी राहुल नार्वेकरांना लोकसभेची लालुच दाखवून निकाल फिरविला. आता निष्ठावंत शिवसैनिक यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाहीत.असे ठोस प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कळंब येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेची मार्केट यार्डात जाहीर सभा दि.८ मार्च रोजी दुपारी १ वाजता संपन्न झाली. या सभेत शिवसैनिकांना मार्गदर्शन करीत असताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,महाविकास आघाडी सरकारमध्ये मला काही अपरिहार्य कारणामुळे मुख्यमंत्री व्हावे लागले. परंतु, मी बाळासाहेबांना वचन दिले आहे की, शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करणार, त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, असा आशावाद व्यक्त करून खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे- पाटील यांच्या कामाचे कौतुक करत तुम्हा दोघांनाही कायमस्वरूपी सभागृहात राहायचे आहे, असे सांगून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोघांची उमेदवारी फायनल असल्याचे यावेळी त्यांनी संकेत दिले. याप्रसंगी खा.संजय राऊत म्हणाले की,ज्या ईडी सीबीआयला मी बांबू लावला, त्यांना घाबरून हे पळपुटे डरपोक पळाले. कळंबमध्ये निष्ठावंतांचा जनसागर उसळला असून येथील निष्ठावंतांचा ओके पॅटर्न (खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील) राज्यभर राबवू. गद्दारांना शिवसैनिकच काय, देव सुद्धा माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी फुटीर आमदारांना दिला. खा.ओमराजे निंबाळकर म्हणाले की,मी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, म्हणून मी सात वेळा सभागृहात आवाज उठविला, आम्ही पहिल्यापासूनच या लढ्यात आहोत. परंतु जरांगे पाटील फडणवीसांवर बोलल्यावरच काही जणांची तोंडे उघडली. त्यांना समाज महत्वाचा नाही आणि ते स्वतःचे धन लपविण्यासाठी भाजपमध्ये गेले असल्याचा आरोप भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर केला. आमदार कैलास घाडगे पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिलीप पाटील व लक्ष्मण आडसुळ यांनी सुत्रसंचालन केले. संजय होळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी नार्वेकर, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, माजी आमदार दयानंद गायकवाड, उपनेते शरद कोळी, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, माजी तालुकाप्रमुख रामलिंग आवाड,धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, शंकरराव बोरकर, अतुल कवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, युवासेनेचे तालुकाप्रमुख मनोहर धोंगडे, लक्ष्मण आडसुळ, संतोष लांडगे, राजेश्वर पाटील, सचिन काळे आदीसह तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले