कळंब – प्रत्येक प्राण्याचे जिवंत असल्याचे लक्षण म्हणजे त्याचा श्वास होय.जसा श्वास जीवनासाठी आवश्यक आहे, तसाच विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाला श्वासाइतकेच महत्त्व दिल्यास यश निश्चित मिळते, असे प्रेरणादायी प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मराठवाडा अध्यक्ष तथा मुख्याध्यापक परमेश्वर पालकर यांनी केले. तालुक्यातील पवनराजे निंबाळकर हायस्कूल,भोगजी येथे आयोजित इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष वसंत खराटे, प्रमुख पाहुणे डिगांबर डाके, मुख्याध्यापक डॉ.शिवाजी चव्हाण,पत्रकार संदीप कोकाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास चौधरी,पालक बालासाहेब चिरके तसेच मुख्याध्यापक रमेश पालकर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना पालकर यांनी सांगितले की,शासनाने दहावी-बारावी परीक्षेची पद्धत सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना यशस्वी होता यावे,या दृष्टीने स्वीकारली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता हसत-खेळत परीक्षेला सामोरे जावे.अपयश आले तरी खचून न जाता विविध खाजगी अभ्यासक्रमांच्या माध्यमातून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्याध्यापक डॉ. शिवाजी चव्हाण व सहशिक्षक डिगांबर डाके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका पंडित शितल यांनी केले.सूत्रसंचालन विद्यार्थिनी दिक्षा राऊत हिने केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका दिपाली आवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब देवकते,सुकुमार पालकर,सचिन बिडकर व सिद्ध झेंडे यांनी विशेष प्रयत्न केले.
More Stories
पानगावात लाखोंचे अफू पीक जप्त
आदर्श इंग्लिश स्कूलचे रंगतदार स्नेहसंमेलन
स्वयंशासन दिनातून नेतृत्वाची शिकवण;दहावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप