February 8, 2026

पत्रकारांच्या लेखणीतून लोकशाही बळकट – गटविकास अधिकारी सोपान अकेले

  • कळंब – पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून राष्ट्र, समाज व लोकशाही बळकट करण्याचे मोलाचे कार्य करीत असतात.शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी केले.
    दि.६ जानेवारी २०२५ रोजी कळंब पंचायत समिती कार्यालय येथे आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपस्थित पत्रकारांचा डायरी,पेन व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी मनीषा सुकाळे,विस्तार अधिकारी हनुमंत झांबरे,दत्तात्रय साळुंखे,आरोग्य विभाग अधिकारी बाबुराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
    याप्रसंगी संपादक लक्ष्मण शिंदे यांनी ग्रामीण भागातील पत्रकार सामाजिक बांधिलकीतून लेखन करीत असून त्यांच्या बातम्यांमुळे अनेक वंचित घटकांना न्याय मिळतो,असे सांगितले.ज्येष्ठ पत्रकार बालाजी अडसूळ यांनी चांगल्या कामाचे कौतुक करतानाच कामातील उणिवा अधोरेखित करण्याचे कार्य पत्रकार करतात,त्यामुळे कधी कधी विरोध पत्करावा लागतो,असे मत व्यक्त केले.
    ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर व ‘दर्पण’ नियतकालिकाच्या योगदानावर प्रकाश टाकला. तर हनुमंत पाटुळे यांनी पत्रकार क्षेत्रातील विविध समस्या मांडल्या.
    गौर येथील माजी पंचायत समिती सदस्य माने बाप्पा व सहाय्यक गट विस्तार अधिकारी मनीषा सुकाळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
    या कार्यक्रमात व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र प्रदेश शिक्षण विभाग प्रमुख चेतन कात्रे,बालाजी बाप्पा आडसूळ,लक्ष्मण शिंदे, समीर मुल्ला,माधवसिंग राजपूत, हनुमंत पाटुळे,रामरतन कांबळे, रसूल तांबोळी,बाबुराव पौळ, प्रवीण कसबे आदी पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विस्तार अधिकारी हनुमंत झांबरे यांनी केले.
error: Content is protected !!